Sunday, November 27, 2022

आतले‌ - बाहेरचे.....

प्रशिक्षणाच्या सुरवातीच्या दिवसातच एक छान गोष्ट ऐकण्यात आली होती...गोष्टीचे नाव होते 'आतले-बाहेरचे'....तर गोष्ट अशी होती की समजा एखादी आगगाडी धावतेय...तर त्यातले सगळे प्रवासी म्हणजे आतले...गाडी फलाटावर येते तेंव्हा चढण्या उतरण्याची लगबग सुरु होते..तेंव्हा फलाटावर उभे राहुन गाडीची वाट पाहणारे असतात बाहेरचे...गाडी आली की हे बाहेरचे अगदी ताकदीने आत शिरण्यासाठी धडपडतात...शिरताना ते बाहेरचे असतात, आत आले की हेच बाहेरचे बाहेरच्यांना आत येऊ देत नाहीत, कारण आता हे आतले झालेले असतात... काहीच क्षणाचा अवधी अन् माणसं अशी बदलतात...थोडक्यात हेच प्रशासनातही दिसते...आतले बाहेरचे हे दृश्य इथंही पाहायला मिळतं, बाहेरचे आत आले की आतले होतात अन् बाहेरच्यांना परके होतात....सांगायचा मुद्दा असा की ही कथा जितकी नैसर्गिक आहे, तितकीच आपली व्यथा ही ..बाहेरचे आतले झाल्यावर त्यांची बाहेरच्यांबद्दलची सहानुभूति संपता कामा नये... आपण बाहेरच्यांचा मार्ग अडवण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी आत आलोत, ह्याचा विसर पडु नये कधीच...हा मोलाचा उपदेश प्रशिक्षणात मिळाला खरा...पण तो अंगिकृत करणं सर्वस्वी आमच्याच हाती आहे...आतले अन् बाहेरचे सारेच आपले, हा एकच मंञ लक्षात ठेवला तर जगण्याचं तंञही सापडेल अन् प्रशासनाचं यंञही कधीच बिघडणार नाही हेही तितकंच खरं....बाहेरच्यांची व्यथा आतल्यांना कळली पाहिजे, हेच ही कथा आपल्याला सांगते... !

आज हे आठवण्याचं कारण म्हणजे ही कथा डोळ्यासमोर घडताना पाहिली...बस मध्ये एका सीटवर मी आणि एक काका दोघे बसलो होतो...एक आजीबाई बसु द्या म्हटल्यानं आम्ही त्यांना जागा करुन दिली...काही अंतरावर काका उतरले मग सीटवर मी अन् आजीबाई दोघेच...थोड्यावेळात एक दुसर्या ताई बसु द्या म्हणुन जागा मागत होत्या, तर ह्या आजीबाई सांगताय, "पोरी जागाच कुठंय इथं..हेव पोर्या अन् मी दोघंच बसलोय..दोघांचीच जागा आहे ना इथे"....अन् अशा तर्हेने आजीबाईने त्या बाईला शिताफीने नकार दिला... तेंव्हा आतले बाहेरच्यांची कथा न कळत आठवली...!! असो. हे सारे अनुभव आपल्याला बरंच काही सांगत असतात, शिकवत असतात...आपण फक्त उघड्या डोळ्यांनी बघितले पाहिजे...अन् ऐकले पाहिजे....प्रशिक्षण काय फक्त संस्थेतच होत असतं का...?

"बिन भितींची उघडी शाळा, 

  लाखो इथले गुरु "

असं निसर्गाचं वर्णन गदिमा करतात ते किती सार्थ आहे याची प्रचिती येत जाते...!! आपल्या आजुबाजुला हे असं घडत असताना आपलं प्रशिक्षणच चालु असतं...फक्त आपण ठरवायचं असतं...घडणार्या प्रसंगातुन काय शिकायचं...जागा द्यायला की कारणं द्यायला...देता दोन्ही ही येतं...फक्त कारणं देणारा लिहीणार्याच्या पानात शिरतो, तर जागा देणारा वाचणार्याच्या मनात ...एवढंच ...!!




#असंच काहितरी...



Saturday, November 26, 2022

श्री देव मामलेदार यशवंतराव महाराज मंदिर

आपण जनतेशी माणसासारखे जरी वागलो तरी जनता आपल्याशी देवासारखी वागते....आपल्या अधिकारपणासोबत आपलं माणुसपण जपुन ठेवुन गोरगरीबांच्या कामी येणारे ब्रिटिशकालीन तहसिलदार यशवंत महाराज  यांचे सटाणा (नाशिक) येथील मंदिर हे ह्याचेच उदाहरण...तेंव्हा अधिकारीपण हे माणुसपण हिरावुन घेणारं नसावं, एवढंच....!!




#असंच काहितरी

#श्री देव मामलेदार यशवंत महाराज मंदिर

#सटाणा (नाशिक)





26/11


 

Friday, November 18, 2022

लष्करी संलग्नता....#Army_Attachment

पायाभुत प्रशिक्षणानंतर Attachment असा काहीसा प्रकार आपल्या प्रशिक्षणाचा भाग आहे, हे कळले अन् काही सुरवातीच्या संलग्नता पार पडल्या...तेंव्हा वाटले होते नाव फक्त attachment पण कुठेच attach न होऊ देता,  काही कळवं तितक्यात पुढे पळावं लागतंय...माञ लष्करी संलग्नता ही पहिल्या विधानाला अपवाद ठरली, कारण बाकी इतर कुठेही नव्हे इतका समृद्ध अनुभव ह्या पाच दिवसात मिळाला...शिस्तीचे धडे वाचले होते, ते आपले लष्कर प्रत्येकक्षणी जगते हे या काळात याची देही याची डोळा अनुभवता आले..सिनेमात दिसणार्या काही गोष्टी प्रत्यक्ष पाहता आल्या..जो गणवेश अंगावर चढवण्यासाठी प्रचंड किंमत लष्कराला मोजावी लागलेली असते, तो काही काळ तरी आपल्या ह्या साधारण देहावर चढवायला मिळाला, अन् असाधारण अशी अनुभुती मिळाली...जवानांची माशुका म्हणुन प्रसिद्ध असणारी INSAS 5.56mm Rifle हाती घेऊन शुट करण्याचे प्रात्यक्षिक करता आले...मॅप रिडींगचे धडे घेऊन जंगलात नकाशाच्या आधारे कसे मार्गक्रमण करायचे याचीही प्रात्यक्षिकासह शिकवण मिळाली....एकंदरीत एक समृद्ध अनुभव ह्या attachment च्या काळात मिळाला...अन् attach न होऊ देणार्या ह्या attachment च्या सोहळ्यात लष्कराशी अजुन जास्त attach झालो, हे नक्की...पण ठरल्याप्रमाणे केले ते कमीच अन् झाले तेही थोडेच...आता कुठे जरा काही कळु लागले, तेंव्हा फार काही कळावे तितक्यात जिल्हा संलग्नतेचा आदेश धडकल्याने पुढे पळावे लागतेय....असो. हा अनुभव आयुष्यभर स्मरणात राहिल असा होता...खरंतर असे अनुभवच आयुष्य समृद्ध करत जातात...शेवटी काय, आयुष्य श्रीमंत असण्यापेक्षा समृद्ध असणेच गरजेचे असते...अन् ते होते आहे....या सगळ्या अविस्मरणीय आठवणी देऊन आमची पाठवणी केल्याबद्दल औरंगाबाद छावणीमंडळात असणार्या सर्वच लष्कराचे मनःपुर्वक आभार...तसेच सर्वच भारतीय लष्कराला त्यांच्या देशेसेवेसाठी कायम सलाम...!!



#Amry_Attachment

#Indian_Army_Nations_Pride

#Aurangabad_Cantonment

#CPTP8