गांधी हा चेष्टेचा, हेटाळणीचा विषय व्हावा इतकं असं गांधीकडून काय चुकलं की गांधी समजून घेताना आपलंच काही चुकलं ? अर्थात गांधीचं चुकलं नसेल त्यापेक्षा अधिक आपलंच चुकलंय....कथा, कादंबऱ्या अन नाटकं म्हणजेचं इतिहास समजणाऱ्या अन व्हाट्सअँप , फेसबुक ह्या विद्यापीठात शिकणाऱ्यांना गांधी हा पाकिस्तानचा कैवारी, देशाचे तुकडे पाडणारा, फाळणीचे कारण, भगतसिंग यांचा फासी पासून बचाव न करणारा, अर्धनग्न फकीर किंवा अजून बरंच काही वाटत असतो... संबंध आयुष्य सत्य अन अहिंसा ह्या विचारांचा जागर करणारा, कधीही कुणाचा विरोध न करणारा गांधी उभा केला जातो कधी आंबेडकर तर कधी नेताजी यांच्या विरुद्ध तर कधी चक्क आधुनिकतेच्याही विरुद्ध.... एक मात्र खरं... गांधी काही केल्या संपत नाही... गांधी कितीदाही मारला तरी मरत नाही... गांधी पुरून उरतो साऱ्यांनाच...अन म्हणून गांधी वर कितीही लिहिलं तरी गांधी अनाकलनीयच ठरतो... गांधीजी वरती अनेक पुस्तकं लिहिली गेली, सिनेमे झाले, नाटकं झाली... काहींनी समज दिली तर काहींनी गैरसमज निर्माण केले...विनायक होगाडे लिखित ओह माय गोडसे हे असेच एक अत्यंत सुंदर गांधीजी बद्दलचे गैरसमज दूर करणारे पुस्तक...मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक बघून नथुराम बनलेल्या एकावर मानसोपचार तज्ञ उपचार करताना नाटक रचतात अन गांधीजी बद्दलचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतात... अशी एकंदरीत कथा आहे... पुस्तकाचे विशेष म्हणजे हे पुस्तक हा इतिहास नाही, ऐतिहासिक दस्ताऐवज नाही असे स्पष्टीकरण लेखकाने सुरवातीलाच दिले आहे... तरीही गांधीजी मजबुरी का नाही तर मजबुती का नाम आहे हे या पुस्तकाच्या वाचनातून सहज लक्षात येते..... पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आहे... प्रसंग अत्यंत रोचक पद्धतीने उभे केलेले आहेत... एकदा वाचायला घेतल्यावर खाली ठेवूच वाटणार नाही असं एका बैठकीत वाचून पूर्ण होणारं अत्यंत सुंदर पुस्तक म्हणजे ओह माय गोडसे... हे वाचल्यावर आपसूकच तोंडी शब्द येतात - ओह माय गॉड ! व्हॉट अ बुक !
#असंच_काहीतरी
#Book_Review
No comments:
Post a Comment