Monday, April 28, 2025
Monday, March 17, 2025
Book Review : सीतायन (डॉ. तारा भवाळकर)
सीतेला सासुरवास केला ग केसी केसी
वाटून दिला तिने सयांना देसोदेशी
किंवा
सीतेला सासुरवास झाला ग परोपरी
वाटून दिला तिने सयांना घरोघरी
सीतेला सासुरवास झाला ग बहु बहू
वाटून दिला तिने सयांना गहू गहू
अशाप्रकारे जात्यावरच्या ओव्यांमध्ये सीता उमटते. सीतेचा त्रास, वनवास बघून भारतीय स्त्री मन आपलं दुःख हलकं करतं. रामाने तिला वनवासाला पाठवलं. असं असलं तरी रामाचं देवपण खुजं न करता स्त्रिया सीतेचं दुःख मांडताना म्हणतात,
सीता नारीला वनवास, तुमची आमची काय कथा
देव माणसाच्या घरी कलियुग शिरला होता
रामाचं देवपण खुजं न करता लोकरामायणातली सीता प्रत्येक स्त्रीच्या जीवाची सखी झाली आहे. सीतेच स्थान रामापेक्षा या स्त्रियांना काकणभर उंचावरचं वाटतं आणि म्हणूनच त्या म्हणतात,
राम म्हणू राम, न्हाई सीताच्या तोलाचा
हिरकणी सीतामाई, राम हालक्या दिलाचा
या पुस्तकात लेखिकेच्या भाव विश्वातील राम, लोक मानसातील राम, सीतेचे दोन वनवास, रामाची अ-काल दुर्गापूजा, स्फूटओवितील सीतायन, अंकुश पुराण, मूळ कन्नडातील चित्रपट रामायण, (बंगालीतील) चंद्रावती रामायण, दशरथ जातक आणि आदिवासींचे सीतायन, असे विविध लेख आहेत. विविध लोककथांमध्ये कमी अधिक फरकाने रामकथेत सीतेचा वनवास आलेला आहे. सीता ही नक्की कोण होती तिचे माता-पिता कोण होते या प्रश्नांची उत्तरं अजूनही स्पष्टपणे कुणाकडे सापडत नाहीत. याचं कारणच हे आहे की वाल्मिकी रामायण व इतर सर्व रामायणं यांच्यात एकवाक्यता नाही. काही लोककथांमध्ये सीता रावणाची मुलगी, तर काही लोककथांमध्ये सीता रामाची बहिण असाही उल्लेख सापडतो अर्थात हे सर्व ऐकायला बरं वाटत नसलं तरी तत्कालीन परिस्थितीचा विचार केल्यास काही बाबी पटायला सोप्या जातात. मुळात रामायण हा आपल्या सबंध भारतीय जनांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, मात्र रामायणाची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा तेव्हा रामायण सीतेमुळे घडलं असंच आपण ऐकतो, पण या पुस्तकातलं विवेचन वाचल्यानंतर आपण विचार करू लागतो की खरंच रामायण सीतेमुळे घडलं की आपली बुद्धी न चालवता दुसऱ्यावर विश्वास ठेवणाऱ्या रामा मुळं ? खरंतर रामायण कुणामुळे घडलं हा मूळ प्रश्न नाहीच. खरा प्रश्न हा आहे की भारतीय सीतेचा वनवास कधी संपणार ? भारतातील सीतांची वेदना कधी संपणार ? "नुसता रावण संपून चालणार नाही तर निष्करूण पद्धतीने सीतेचा विचार करणारा रामही संपला पाहिजे आणि भवभूतीच्या उत्तर रामचरितामधला करुणांकित राम जागा झाला पाहिजे",असं जे डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे म्हणतात ते अगदी योग्य असल्याचं आपल्याही मनाला पटतं. पुस्तकाच्या शेवटी बंगालीतील चंद्रावती रामायणाच्या संहितेचा मराठी अनुवाद देखील आपल्याला वाचायला मिळतो. पुस्तकात भरपूर वैचारिक मंथन आहे. प्रत्येक बाब वाचताना आपण विचार मग्न होतो. नवीन काहीतरी सापडल्याचा आनंद होतो, मात्र सीतेचं सनातन दुःख संपत नसल्याखंत ही वाटू लागते. प्रत्येक विचारी माणसानं वाचायलाच हवं असं डॉ. तारा भवाळकर यांचं 'सीतायन' हे पुस्तक वाचून समृद्ध झाल्याची भावना मनात येते. सीता-राम कथेचे विविध कंगोरे जाणून घेण्यासाठी आणि लोककथांमधील रामायण समजून घेण्यासाठी हे 'सीतायन' नक्की वाचा.
पुस्तकाचे नाव : सीतायन
लेखिका : डॉ. तारा भवाळकर
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन
#असंच_काहीतरी
#Book_Review
Book Review : स्टॉप ओव्हरथिंकिंग (निक ट्रेटन)
पुस्तकाचे नाव : स्टॉप ओव्हरथिंकिंग
प्रकाशक : माय मिरर पब्लिशिंग हाऊस
लेखक : निक ट्रेटन
अनुवाद : अवंती वर्तक
#असंच_काहीतरी
#Book_Review
Sunday, March 16, 2025
Tuesday, March 11, 2025
जागतिक महिला दिन विशेष
Wednesday, February 19, 2025
Saturday, February 15, 2025
Book Review : नेमका हात कुणाचा (सागर काकडे)
माझ्या कवितेचा खून त्यांना परवडणारा नव्हता !
अशा शब्दात आपली कविता ही किती अपरवडनीय आहे असे सांगणारा कवी म्हणजे सागर रामचंद्र काकडे. या कवीचा कवितासंग्रह - नेमका हात कोणाचा ? नुकताच वाचनात आला. या कवितासंग्रहातील कविता ह्या मुक्तछंदातील आहेत. कविता मुक्त असतील मात्र त्यातील शब्द आपल्याला बांधून ठेवतात, विचार करायला लावतात. अगदी थोडक्यात सांगायचं तर कवितासंग्रहातील कविता प्रेम, प्रणय, निषेध, विरह, विरोध आणि विद्रोह इथपर्यंत जाऊन पोहचतात आणि फक्त त्या पोहोचत नाहीत तर आपल्यालाही घेऊन जातात. 'बांगडी' ह्या कवितेत कवी म्हणतो,
बांगडी नसते गर्विष्ठ
नसते जरा ही तकलादु
बांगडी जाहीरपणे बोलत नाही काही
तिच्यातच सामावलेली असते
अख्खी बाई
बाईच्या बांगडीचा इतका खोलवर विचार या कवितेत आपल्याला सापडतो. कवी फक्त प्रेमाची गाणी गात नाही तर व्यवस्थेने दिलेला त्रास सुद्धा त्याच्या ध्यानी आहे आणि म्हणूनच 'जाहिरात' या कवितेत कवी शेवट करताना असे म्हणतो,
बटव्यात शेवटची उरलेली
तंबाखू मळत
सारी स्वप्न तळहातावर चोळत
तो घराकडे निघतो
रोज माणसांना
चुना लावणाऱ्या व्यवस्थेला शिव्या देत
यात फक्त अगतिकता नाही व्यवस्थेविरुद्धचा विरोध आहे, विद्रोह आहे. इंडिया आणि भारत यातल्या अंतरावर चर्चा होत राहते मात्र फक्त चर्चेतून प्रश्न सुटला नाही म्हणूनच त्यावर वारंवार लिहिलं जातं, बोललं जातं. त्याच अंतरावर इंडिया आणि भारत ही कशी दोन भिन्न टोकं आहेत आणि त्या दोन टोकावर असणाऱ्या माणसांचं जग सुद्धा वेगवेगळं आहे, हे मांडताना 'भिन्न टोक' नावाच्या कवितेत कवी असं म्हणतो,
पब मधल्या चांदण्या
कितीही सुंदर भासत असल्या तरी
अप्सरा वगैरे नकली असतो इंद्र
नोकरी टिकवण्यासाठी
प्रत्येकाच्या मानेला सुरा लावून
उभा असतो लाचार चंद्र
आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांना सामोरे जाताना काही गोष्टी आपल्या सोबतच घडतात असं जेव्हा वाटतं तेव्हा लेखक, कवी त्यांच्या कलाकृतीत असं काही लिहून जातात की असं जाणवतं, आपण एकटे नाही, हे दुःख, ह्या वेदना, हा त्रास आपल्यासारखाच कित्येकांच्या वाट्याला आलेला असतो किंवा येणार असतो आणि हे वास्तव आहे हे आपण स्वीकारायला लागतो कारण वास्तवाच्या विस्तवाचा कितीही त्रास होत असला तरी ते स्वीकारण्याशिवाय माणसाच्या जवळ दुसरा उपाय नाही. अशाच सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांना रेखाटताना 'किती भयानक असतं ना' या कवितेत कवी म्हणतो,
ज्यांच्यासाठी आपण
मरून गेलेलो असतो
त्यांच्यासाठीच आपल्याला
जगावसं वाटतं
कीती भयानक असतं ना
मानवी जीवनाची ही वास्तव बाजू मांडताना कवी आयुष्याकडे किती परखड भूमिकेतून बघतो हे समजतं. सामाजिक बाबींकडे लक्ष वेधताना बाईला उंबऱ्याच्या आत राहायला शिकवणाऱ्या संस्कृतीचा कवी आपल्या कवितेत वेध घेतो आणि 'चेला' या कवितेत असे म्हणतो,
बाई बाई असते सांगणारा उंबरा
संस्कृतीचा चेला
उंबऱ्याला संस्कृतीचा चेला मानतो कवी.
समाजातील परिस्थितीच भान असणं हे कुठल्याही साहित्य कृतीसाठी अत्यंत आवश्यक असतं तेच समाज भान ठेवून समाजातील दुर्लक्षित, नजरेआड राहिलेल्या बाबींकडे लक्ष वेधण्याचे काम साहित्यिक करत असतात. या कवितासंग्रहातील 'देणं घेणं' या कवितेत कवीने इंद्रायणीच्या पाण्यात डुबकी मारून भक्तांनी देवाच्या नावाने टाकलेले किंवा कोणीतरी सरणाची राख पाण्यात सोडताना टाकलेले पैसे जमा करणाऱ्या पोराचं लक्ष हे जागतिकीकरणावर किंवा इतर कुठल्याही गोष्टीवर नसतं तर ते त्याच्या भुकेवर असतं हे ठासून सांगितले आहे. जगभर वाढत जाणारी कट्टरता, धर्मांधता, पसरणारा आतंकवाद, दहशतवाद या बाबींचे वर्णन करून कवी थांबत नाही तर त्यावर उपाय सुद्धा सुचवण्याचं काम तो करतो. 'कट्टरता' या कवितेत कवी म्हणतो,
माणूस सिरयात मरू दे
नाहीतर तुझ्या एरियात
मालेगावात मरू दे
किंवा भीमा कोरेगावात
जात पात धर्म यापेक्षा
एका माणसाचा जीव सुद्धा मोलाचा असतो
मित्रा त्या जीवासाठी आपण
समतेचा वारं पसरवायला हवं
हेच समतेचे वार पसरवण्याचं काम कवी आपल्या कवितेतून करतो आहे. हे काम इतकं सोपं नाही. शब्दांचे शिलेदार राजरोस मारले जातायत, शब्द शस्त्रापेक्षाही असहनीय होतायत आणि म्हणूनच शब्दांची पालखी वाहणाऱ्या व्यक्तींना गोळ्या घातल्या जातायत. कदाचित हीच भीती या ही कवीच्या मनात असावी मात्र त्या भीतीने घाबरून न जाता उलट कवी आपल्या कवितेत असं म्हणतो,
अरे धार लावली आता होऊ द्या ना घनघोर युद्ध
तुमच्या गोळ्या आणि माझे शब्द
म्हणजेच शत्रूच्या, धर्मांधांच्या गोळ्यांपेक्षाही आपले शब्द धारदार आहेत, शक्तिमान आहेत, याची खात्री कवीला पटलेली आहे आणि म्हणूनच कवी आव्हान देतो की,
माझ्यातला छत्रपती एकदा अजमावूनच बघा
नाहीतर तुमच्या एका गोळीवर माझं सुद्धा नाव लिहा.
अशाप्रकारे , या कवितासंग्रहात विविध कविता विविध अंगी विचारांना जाग करणाऱ्या आहेत. तेव्हा आपल्याला जाग यायला हवी असं वाटणाऱ्या प्रत्येकानं हा कवितासंग्रह वाचायला हवा. समाजातील नको असणाऱ्या घटनांमागे नेमका हात कोणाचा याचा विचार करायला हवा. इतकी उत्तम कलाकृती वाचकांना उपलब्ध करून देण्यामागे असणाऱ्या नेमक्या हाताचे म्हणजेच कवीचे विशेष आभार.









