Monday, March 17, 2025

Book Review : सीतायन (डॉ. तारा भवाळकर)


सीता ही पतिव्रता म्हणून भारतीय स्त्री समोर कायम आदर्श बनून राहिलेली आहे. येथील प्रत्येक अडल्या-नडलेल्या स्त्रीला आजही आपण सीतेची उपमा देत असतो. सीता ही सोशिकतेचं मूर्तीमंत प्रतीक, सहनशील स्त्रीयांची प्रतिनिधी अशी आपण ऐकलेली, वाचलेली आहे. आपल्या लहानपणी आपण बघितलेल्या, ऐकलेल्या रामायणात राम हा केंद्रबिंदू तर सीता ही रामायणाचे कारण अशीच रंगवलेली दिसते. खरंतर वाल्मिकी रामायण व त्यानंतर लोकपरंपरेतील अनेक सीता-राम कथा यात बरेच भेद सापडतात. लोकपरंपरेतील स्त्री रचित रामकथा या खरंतर राम कथा असण्यापेक्षा सीताकथा आहेत आणि म्हणूनच त्यांना रामायण म्हणण्याऐवजी सीतायन म्हणणे जास्त योग्य होईल, अशी भूमिका लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर आपल्या समोर मांडतात. त्यांचे सीतायन हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. हे पुस्तक म्हणजे फक्त सीतेची व्यथा आणि कथा नसून सीतेच्या वेदनेचा आणि विद्रोहाचा वेगवेगळ्या लोक रामायणात सापडलेला सूर आहे. हे पुस्तक एक लेखसंग्रह आहे. भारतातील वेगवेगळ्या प्रदेशात राम सीता विविध ओव्यातून, गाण्यातून, कथातून वेगवेगळ्या लोकसमूहाने मांडलेल्या आहेत. या सर्व लोकपरंपरेतील सीता-राम कथा व त्यावरील विवेचन, विश्लेषण या पुस्तकातील विविध लेखात आपल्याला वाचायला मिळते. आपल्याला माहित असलेल्या रामायणातील तथ्यांशी न जुळणारे बरेच तथ्य यात सापडतात. खरंतर राम कथा ही भारतीय परंपरेतील एक मिथक आहे, असेही म्हटले जाते. मात्र ते मिथक असो वा सत्य त्यातील मानवीमूल्ये जी मानवी जीवनासाठी आवश्यक आहेत ती नक्कीच आपण स्वीकारू शकतो. या पुस्तकात मुख्य चर्चा ही सीतेच्या वनवासाबद्दल आपल्याला वाचायला मिळते . सीतेचा एक वनवास जो रामासोबत तिला भोगाव लागला, तो आपण बघितलेला वाचलेला आणि ऐकलेला आहे, मात्र तिचा दुसरा वनवास जो रामाशिवाय होता तो मात्र आपल्याला फारसा परिचयाचा नाही. त्या दुसऱ्या वनवासाचे कारण वेगवेगळ्या लोककथांमध्ये वेगवेगळे आहे. काही ठिकाणी धोब्याची कथा आहे, तर काही ठिकाणी कैकयीला जबाबदार धरलेय तर काही ठिकाणी सीतेची नणंद व रामाची सावत्र बहिण कुकवा हिला दोषी ठरवण्यात आलेलं आहे. जबाबदार कुणीही असो आणि कारण काहीही असो, मात्र सीतेच्या वाट्याला सदा सर्वदा सासुरवास, छळ आलेला आहे. भारतीय स्त्री मनाला कदाचित सीतेच्या याच व्यथेमुळे सीता जवळची वाटत असावी. त्यामुळे जात्यावरच्या ओव्या गाताना बाया म्हणत राहतात,

सीतेला सासुरवास केला ग केसी केसी

वाटून दिला तिने सयांना देसोदेशी

किंवा 

सीतेला सासुरवास झाला ग परोपरी 

वाटून दिला तिने सयांना घरोघरी 

सीतेला सासुरवास झाला ग बहु बहू 

वाटून दिला तिने सयांना गहू गहू 


अशाप्रकारे जात्यावरच्या ओव्यांमध्ये सीता उमटते. सीतेचा त्रास, वनवास बघून भारतीय स्त्री मन आपलं दुःख हलकं करतं. रामाने तिला वनवासाला पाठवलं. असं असलं तरी रामाचं देवपण खुजं न करता स्त्रिया सीतेचं दुःख मांडताना म्हणतात,

सीता नारीला वनवास, तुमची आमची काय कथा 

देव माणसाच्या घरी कलियुग शिरला होता 


रामाचं देवपण खुजं न करता लोकरामायणातली सीता प्रत्येक स्त्रीच्या जीवाची सखी झाली आहे. सीतेच स्थान रामापेक्षा या स्त्रियांना काकणभर उंचावरचं वाटतं आणि म्हणूनच त्या म्हणतात,

राम म्हणू राम, न्हाई सीताच्या तोलाचा

हिरकणी सीतामाई, राम हालक्या दिलाचा


या पुस्तकात लेखिकेच्या भाव विश्वातील राम, लोक मानसातील राम, सीतेचे दोन वनवास, रामाची अ-काल दुर्गापूजा, स्फूटओवितील सीतायन, अंकुश पुराण, मूळ कन्नडातील चित्रपट रामायण, (बंगालीतील) चंद्रावती रामायण, दशरथ जातक आणि आदिवासींचे सीतायन, असे विविध लेख आहेत. विविध लोककथांमध्ये कमी अधिक फरकाने रामकथेत सीतेचा वनवास आलेला आहे. सीता ही नक्की कोण होती तिचे माता-पिता कोण होते या प्रश्नांची उत्तरं अजूनही स्पष्टपणे कुणाकडे सापडत नाहीत. याचं कारणच हे आहे की वाल्मिकी रामायण व इतर सर्व रामायणं यांच्यात एकवाक्यता नाही. काही लोककथांमध्ये सीता रावणाची मुलगी, तर काही लोककथांमध्ये सीता रामाची बहिण असाही उल्लेख सापडतो अर्थात हे सर्व ऐकायला बरं वाटत नसलं तरी तत्कालीन परिस्थितीचा विचार केल्यास काही बाबी पटायला सोप्या जातात. मुळात रामायण हा आपल्या सबंध भारतीय जनांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, मात्र रामायणाची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा तेव्हा रामायण सीतेमुळे घडलं असंच आपण ऐकतो, पण या पुस्तकातलं विवेचन वाचल्यानंतर आपण विचार करू लागतो की खरंच रामायण सीतेमुळे घडलं की आपली बुद्धी न चालवता दुसऱ्यावर विश्वास ठेवणाऱ्या रामा मुळं ? खरंतर रामायण कुणामुळे घडलं हा मूळ प्रश्न नाहीच. खरा प्रश्न हा आहे की भारतीय सीतेचा वनवास कधी संपणार ? भारतातील सीतांची वेदना कधी संपणार ? "नुसता रावण संपून चालणार नाही तर निष्करूण पद्धतीने सीतेचा विचार करणारा रामही संपला पाहिजे आणि भवभूतीच्या उत्तर रामचरितामधला करुणांकित राम जागा झाला पाहिजे",असं जे डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे म्हणतात ते अगदी योग्य असल्याचं आपल्याही मनाला पटतं. पुस्तकाच्या शेवटी बंगालीतील चंद्रावती रामायणाच्या संहितेचा मराठी अनुवाद देखील आपल्याला वाचायला मिळतो. पुस्तकात भरपूर वैचारिक मंथन आहे. प्रत्येक बाब वाचताना आपण विचार मग्न होतो. नवीन काहीतरी सापडल्याचा आनंद होतो, मात्र सीतेचं सनातन दुःख संपत नसल्याखंत ही वाटू लागते. प्रत्येक विचारी माणसानं वाचायलाच हवं असं डॉ. तारा भवाळकर यांचं 'सीतायन' हे पुस्तक वाचून समृद्ध झाल्याची भावना मनात येते. सीता-राम कथेचे विविध कंगोरे जाणून घेण्यासाठी आणि लोककथांमधील रामायण समजून घेण्यासाठी हे 'सीतायन' नक्की वाचा.

पुस्तकाचे नाव : सीतायन 

लेखिका : डॉ. तारा भवाळकर 

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन 


#असंच_काहीतरी 

#Book_Review

Book Review : स्टॉप ओव्हरथिंकिंग (निक ट्रेटन)


आपण सर्वजण कमी अधिक प्रमाणात अति विचाराने पछाडलेले असतो. कधी ना कधीतरी आपल्या आयुष्यात अति विचाराचे प्रसंग येतात त्यातून अस्वस्थता (Anxiety) जाणवते. विचारांची न तुटणारी साखळी आपल्या मनात वारंवार तयार होत राहते. जे अस्तित्वात नाही, जे वर्तमानात नाही, जे भविष्यात होईल याची खात्री देखील नाही, अशा सगळ्या गोष्टींचा आपण विचार करत बसतो. एवढेच नाही तर हे सगळं कसं थांबवायचं याचा ही विचार आपण सर्वजण करतो. खरंतर अति विचार कसे थांबवायचे याचा सतत विचार करत राहणं, हाही अतिविचाराचाच एक भाग म्हणता येईल कारण आपण इथे प्रत्यक्ष उपाय न अवलंबता फक्त विचार आणि विचारच करत राहतो. ह्या विचाराला कृतीची जोड मिळावी, उपाय अवलंबता यावेत आणि ह्या सगळ्या विचारांच्या साखरदंडातून स्वतःला मुक्त करता यावं, यासाठी इंग्रजी लेखक निक ट्रेटन याने लिहिलेलं "स्टॉप ओव्हरथिंकिंग" हे पुस्तक आपली मदत करू शकतं. या पुस्तकात अस्वस्थतेची कारणे आणि अस्वस्थता व अतिविचार टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याचे सविस्तर वर्णन केलेले आहे. उदाहरणार्थ या पुस्तकात तणाव टाळण्यासाठी चार A टेक्निक्स चा उल्लेख येतो हे. चार A म्हणजे Avoid, Alter, Accept आणि Adapt हे होय. यासोबतच आपली वेळ ऊर्जा याचं व्यवस्थापन कसं करावं ? क्षणार्धात उत्साह मिळवण्यासाठी काय करावे ? स्वतःशी सकारात्मक स्वसंवाद कसा साधावा ? आणि एकूणच आपल्या भावनांवर नियंत्रण कसे मिळवावे ? या सगळ्यांवर या पुस्तकात सहज सोप्या शब्दात चर्चा केलेली आहे. सेल्फ हेल्प गटातील हे पुस्तक आपली निश्चित मदत करू शकते. फक्त ते वाचून बाजूला ठेवलं तर उपयोग नाही. वाचलेल्या बाबी आयुष्यात अवलंबण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपली फार मोठी मदत या पुस्तकाच्या रूपाने आपण स्वतःच करू शकतो.

पुस्तकाचे नाव : स्टॉप ओव्हरथिंकिंग 

प्रकाशक : माय मिरर पब्लिशिंग हाऊस 

लेखक : निक ट्रेटन 

अनुवाद : अवंती वर्तक 


#असंच_काहीतरी 

#Book_Review

Tuesday, March 11, 2025

जागतिक महिला दिन विशेष




जागतिक महिला दिनाच्या औचित्त्याने नगरपंचायत मारेगाव तर्फे विविध स्पर्धांचे आयोजन


मारेगाव नगरपंचायती द्वारे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन नगरपंचायत सभागृहात करण्यात आले. दुपारी तीन वाजता वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. पहिला गट आठवी ते बारावीचे विद्यार्थी तर दुसरा गट हा 18 वर्षावरील महिलांसाठी खुला होता. स्पर्धेमध्ये विद्यार्थिनी व महिला यांनी उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदवला. सदर स्पर्धेचे विषय होते : 

1) स्त्री पुरुष समानता स्वप्न की वास्तव?

2) महिलांसाठीचे सुरक्षा कायदे पुरेसे आहेत का ? 

सहभागी विद्यार्थी व महिलांनी दिलेल्या विषयावर आपली मते मांडली. ह्या स्पर्धेचे परीक्षण मा. मुख्याधिकारी श्री शशिकांत बाबर (म.श.प्र.से.) व युवा वक्ता प्रतिक्षा गुरनुले यांनी केले. या स्पर्धेनंतर चार वाजता पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पाककला स्पर्धेमध्ये शहरातील महिलांनी भाग घेतला. आपल्या घरून बनवून आणलेल्या रुचकर पदार्थांचे सुशोभीकरणासह प्रदर्शन स्पर्धेत करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण माजी नगराध्यक्ष इंदुताई किनेकर व सौ. अंजली बाबर यांनी केले. या दोन्हीही स्पर्धेनंतर बक्षीस वितरण कार्यक्रम संध्याकाळी साडेपाच वाजता पार पडला. बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमासाठी सौ. किरणताई देरकर (अध्यक्ष - एकवीरा महिला ग्रामीण पतसंस्था) या प्रमुख पाहुण्या तर मार्गदर्शक म्हणून डॉ. सपना केलोदे या उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमास मा. नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्की, माजी नगराध्यक्ष इंदुताई किनेकर व रेखाताई मडावी आणि माझी महिला व बालकल्याण सभापती सौ. अरुणाताई खंडाळकर इत्यादी मान्यवरही उपस्थित होते. दोन्हीही स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमासाठी नगरपंचायत च्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मेहनत घेतली. विशेषतः महिला कर्मचाऱ्यांच्या उस्फुर्त प्रयत्नातून कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. नगरपंचायत शहरातील नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचे वेळोवेळी आयोजन करत राहील. अशा सर्व कार्यक्रमास नागरिकांनी प्रतिसाद देत जास्तीत जास्त सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी श्री. शशिकांत शांताबाई मारोती बाबर यांनी कार्यक्रम प्रसंगी बोलताना केले.

#मारेगाव 
#नगरपंचायत
#maregaon_diaries 

Saturday, February 15, 2025

Book Review : नेमका हात कुणाचा (सागर काकडे)


दिली सुपारी त्यांनी माझ्या देहाची दलालांना,

माझ्या कवितेचा खून त्यांना परवडणारा नव्हता !  

अशा शब्दात आपली कविता ही किती अपरवडनीय आहे असे सांगणारा कवी म्हणजे सागर रामचंद्र काकडे. या कवीचा कवितासंग्रह - नेमका हात कोणाचा ? नुकताच वाचनात आला. या कवितासंग्रहातील कविता ह्या मुक्तछंदातील आहेत. कविता मुक्त असतील मात्र त्यातील शब्द आपल्याला बांधून ठेवतात, विचार करायला लावतात. अगदी थोडक्यात सांगायचं तर कवितासंग्रहातील कविता प्रेम, प्रणय, निषेध, विरह, विरोध आणि विद्रोह इथपर्यंत जाऊन पोहचतात आणि फक्त त्या पोहोचत नाहीत तर आपल्यालाही घेऊन जातात. 'बांगडी' ह्या कवितेत कवी म्हणतो,

बांगडी नसते गर्विष्ठ 

नसते जरा ही तकलादु 

बांगडी जाहीरपणे बोलत नाही काही 

तिच्यातच सामावलेली असते 

अख्खी बाई 

बाईच्या बांगडीचा इतका खोलवर विचार या कवितेत आपल्याला सापडतो. कवी फक्त प्रेमाची गाणी गात नाही तर व्यवस्थेने दिलेला त्रास सुद्धा त्याच्या ध्यानी आहे आणि म्हणूनच 'जाहिरात' या कवितेत कवी शेवट करताना असे म्हणतो,

बटव्यात शेवटची उरलेली

तंबाखू मळत 

सारी स्वप्न तळहातावर चोळत 

तो घराकडे निघतो 

रोज माणसांना 

चुना लावणाऱ्या व्यवस्थेला शिव्या देत

यात फक्त अगतिकता नाही व्यवस्थेविरुद्धचा विरोध आहे, विद्रोह आहे. इंडिया आणि भारत यातल्या अंतरावर चर्चा होत राहते मात्र फक्त चर्चेतून प्रश्न सुटला नाही म्हणूनच त्यावर वारंवार लिहिलं जातं, बोललं जातं. त्याच अंतरावर इंडिया आणि भारत ही कशी दोन भिन्न टोकं आहेत आणि त्या दोन टोकावर असणाऱ्या माणसांचं जग सुद्धा वेगवेगळं आहे, हे मांडताना 'भिन्न टोक' नावाच्या कवितेत कवी असं म्हणतो,

पब मधल्या चांदण्या 

कितीही सुंदर भासत असल्या तरी 

अप्सरा वगैरे नकली असतो इंद्र 

नोकरी टिकवण्यासाठी

प्रत्येकाच्या मानेला सुरा लावून 

उभा असतो लाचार चंद्र 

आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांना सामोरे जाताना काही गोष्टी आपल्या सोबतच घडतात असं जेव्हा वाटतं तेव्हा लेखक, कवी त्यांच्या कलाकृतीत असं काही लिहून जातात की असं जाणवतं, आपण एकटे नाही, हे दुःख, ह्या वेदना, हा त्रास आपल्यासारखाच कित्येकांच्या वाट्याला आलेला असतो किंवा येणार असतो आणि हे वास्तव आहे हे आपण स्वीकारायला लागतो कारण वास्तवाच्या विस्तवाचा कितीही त्रास होत असला तरी ते स्वीकारण्याशिवाय माणसाच्या जवळ दुसरा उपाय नाही. अशाच सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांना रेखाटताना 'किती भयानक असतं ना' या कवितेत कवी म्हणतो,

ज्यांच्यासाठी आपण 

मरून गेलेलो असतो 

त्यांच्यासाठीच आपल्याला 

जगावसं वाटतं 

कीती भयानक असतं ना 

मानवी जीवनाची ही वास्तव बाजू मांडताना कवी आयुष्याकडे किती परखड भूमिकेतून बघतो हे समजतं. सामाजिक बाबींकडे लक्ष वेधताना बाईला उंबऱ्याच्या आत राहायला शिकवणाऱ्या संस्कृतीचा कवी आपल्या कवितेत वेध घेतो आणि 'चेला' या कवितेत असे म्हणतो,

बाई बाई असते सांगणारा उंबरा 

संस्कृतीचा चेला 

उंबऱ्याला संस्कृतीचा चेला मानतो कवी.

समाजातील परिस्थितीच भान असणं हे कुठल्याही साहित्य कृतीसाठी अत्यंत आवश्यक असतं तेच समाज भान ठेवून समाजातील दुर्लक्षित, नजरेआड राहिलेल्या बाबींकडे लक्ष वेधण्याचे काम साहित्यिक करत असतात. या कवितासंग्रहातील 'देणं घेणं' या कवितेत कवीने इंद्रायणीच्या पाण्यात डुबकी मारून भक्तांनी देवाच्या नावाने टाकलेले किंवा कोणीतरी सरणाची राख पाण्यात सोडताना टाकलेले पैसे जमा करणाऱ्या पोराचं लक्ष हे जागतिकीकरणावर किंवा इतर कुठल्याही गोष्टीवर नसतं तर ते त्याच्या भुकेवर असतं हे ठासून सांगितले आहे. जगभर वाढत जाणारी कट्टरता, धर्मांधता, पसरणारा आतंकवाद, दहशतवाद या बाबींचे वर्णन करून कवी थांबत नाही तर त्यावर उपाय सुद्धा सुचवण्याचं काम तो करतो. 'कट्टरता' या कवितेत कवी म्हणतो,

माणूस सिरयात मरू दे 

नाहीतर तुझ्या एरियात 

मालेगावात मरू दे 

किंवा भीमा कोरेगावात 

जात पात धर्म यापेक्षा 

एका माणसाचा जीव सुद्धा मोलाचा असतो

मित्रा त्या जीवासाठी आपण 

समतेचा वारं पसरवायला हवं 

हेच समतेचे वार पसरवण्याचं काम कवी आपल्या कवितेतून करतो आहे. हे काम इतकं सोपं नाही. शब्दांचे शिलेदार राजरोस मारले जातायत, शब्द शस्त्रापेक्षाही असहनीय होतायत आणि म्हणूनच शब्दांची पालखी वाहणाऱ्या व्यक्तींना गोळ्या घातल्या जातायत. कदाचित हीच भीती या ही कवीच्या मनात असावी मात्र त्या भीतीने घाबरून न जाता उलट कवी आपल्या कवितेत असं म्हणतो,

अरे धार लावली आता होऊ द्या ना घनघोर युद्ध 

तुमच्या गोळ्या आणि माझे शब्द 

म्हणजेच शत्रूच्या, धर्मांधांच्या गोळ्यांपेक्षाही आपले शब्द धारदार आहेत, शक्तिमान आहेत, याची खात्री कवीला पटलेली आहे आणि म्हणूनच कवी आव्हान देतो की,

माझ्यातला छत्रपती एकदा अजमावूनच बघा

नाहीतर तुमच्या एका गोळीवर माझं सुद्धा नाव लिहा.

अशाप्रकारे , या कवितासंग्रहात विविध कविता विविध अंगी विचारांना जाग करणाऱ्या आहेत. तेव्हा आपल्याला जाग यायला हवी असं वाटणाऱ्या प्रत्येकानं हा कवितासंग्रह वाचायला हवा. समाजातील नको असणाऱ्या घटनांमागे नेमका हात कोणाचा याचा विचार करायला हवा. इतकी उत्तम कलाकृती वाचकांना उपलब्ध करून देण्यामागे असणाऱ्या नेमक्या हाताचे म्हणजेच कवीचे विशेष आभार.