Monday, March 23, 2026

Book Review : थैमान (रामचंद्र नलावडे)


नैसर्गिक आपत्ती येते तेंव्हा प्रशासनासह सर्वच आपापल्या स्तरावर आपत्तीतून सुटका करण्यासाठी धडपडत असतात. मात्र प्रशासनाचे कार्य फक्त आपत्ती काळात नसते, तर आपत्तीपूर्व तयारी, आपत्ती काळात मदत आणि आपत्तीनंतर पुनर्वसन अशा सर्व आघाडीवर प्रशासनास कसरत करावी लागते. महसूल विभागाची यात महत्वाची जबाबदारी असते. इतर विभागासोबत समन्वय साधत महसूल अधिकाऱ्यांना अनेक अनियोजित प्रसंगांना धाडसाने सामोरे जावे लागते. याच विषयाची मध्यवर्ती संकल्पना ठेवून रचलेली कादंबरी म्हणजे रामचंद्र नलावडे लिखित थैमान. 

लेखक स्वतः तलाठी होते. मी नायब तहसीलदार झाल्यावर महसूल प्रशासन अधिक कळावं म्हणून त्यांची 'एका अस्वस्थ तलाठ्याची डायरी' वाचलेलं होतं. ते वाचून बऱ्याच गोष्टींबद्दलचे प्रशासकीय वास्तव समजले होते. मी स्वतः वाचल्यावर बऱ्याच महसूल विभागातील अधिकारी मित्र-मैत्रिणींना हे वाचायला देखील सांगितलं होतं. कदाचित ते जुनं आवडलं म्हणूनच नवीन पुस्तकावर रामचंद्र नलावडे नाव दिसताच विकत घेतलं. बरीच पुस्तकं विकत घेतल्यावर देखील कित्येक दिवस बुकशेल्फ मध्येच आपली वाट पाहत असतात. घेतलेलं सगळं लगेच वाचून होत नाहीत, तरी पुस्तकं विकत घेण्याची हौस काही कमी होत नाही. ते असो. तर नाशिकला मैत्रिणीच्या लग्नाला गेल्यावर तिला पुस्तक भेट देण्यासाठी पुस्तक विकत घ्यायला गेलो अन तिथेच स्वतः साठीही पुस्तकं घेत बसलो. तिथेच हे 'थैमान' नावाचं पुस्तक लेखकाचं नाव बघूनच घेऊन टाकलं. 

पुस्तक वाचायला हाती घेतलं अन दोन दिवसात वाचून झालं देखील. पुस्तक प्रशासनातील अनुभव असणाऱ्या व्यक्तीने लिहिलेलं असल्याने ते अधिक वास्तववादी वाटतं. मान्सूनपूर्व तयारी पासून कादंबरी सुरु होते. यात तहसीलदार, नायब तहसीलदार, प्रांत अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, बिडीओ, नगरपालिका मुख्याधिकारी अशा सर्वांचा उल्लेख येतो. आयएएस अधिकारी प्रांत म्हणून असल्यावर तहसीलदारासह महसूल प्रशासनातील सर्वांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागतो अशी परिस्थिती होते. हे अधिकारी अधिक शिस्तप्रिय, अधिक हेकेखोर, अधिक धाडसी असतात, असा पूर्वापार समज. ते फारसे कुणाला जुमानत नाहीत. राज्यसेवेतील अधिकारी तुलनेने नमतं घेणारे, राजकीय गणितांचा विचार करणारे असतात. असेच चित्र कादंबरीत देखील दाखवलेलं आहे. 

मान्सूनपूर्व नैसर्गिक आपत्तीच्या बैठकीला गैरहजर राहिला म्हणून तलाठ्यास निलंबित करणारे प्रांत यात आपल्याला भेटतात. अनुभव संपन्न असणारे मात्र सेवेतील शिल्लक राहिलेले शेवटचे काही वर्षे शांततेत व निर्विघ्न काढावेत या दृष्टीने कार्य करणारे तहसीलदार भेटतात. प्रशासनात अनुभवापेक्षा पदाला महत्व आहे. वरिष्ठ हा आपल्यापेक्षा कमी वयाचा आहे म्हणून काही त्याला आपण मनात आलं तसं बोलु शकत नाही. यात देखील तहसीलदार यांचा अनुभव हा प्रांतांच्या वयापेक्षा अधिक पण प्रांत चार चौघात तहसीलदारांचा पानउतारा करतात तेंव्हा तहसीलदार काहीच बोलु शकत नाही. हे आपल्या प्रशासकीय व्यवस्थेतलं वास्तव इथे लेखकाने दाखवून दिलं आहे. 

पावसाळा सुरु झाल्यावर दैनिक घडामोडीची व पावसाची नोंद घेण्यासाठी तहसीलला नियंत्रण कक्ष सुरु होतो. ह्या नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना एके दिवशी रात्री महामार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्याची बातमी कळते. सकाळी उजाडल्या बरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता घटना स्थळी जाऊन अत्यंत चोख पद्धतीने रस्ता मोकळा करून देतात. एखादा अधिकारी परिस्थिती कशी हाताळतो यावर सर्व अवलंबून असते. काम करणं आणि टाळणं दोन्ही शक्य असतं तेंव्हा खरा अधिकारी काम करण्याला प्राधान्य देतो. हे इथे अधोरेखित होतं. 

यानंतर शहरात अतिवृष्टी होते. नदीला पूर येतो. पुरात अनेक बाका प्रसंग उद्भवतात. अशावेळी संकट समयी प्रशासनाची त्रेधातिरपीट उडते तेंव्हा मदतीला अनेक संघटना, उदयमी तरुण पुढे येतात. मात्र अशा प्रसंगी स्व स्वार्थ साध्य करण्यासाठी धडपडणारे देखील असतात. नैसर्गिक आपत्ती वेळी मदतीला धावून येणारे असतात तसेच आपत्तीवेळी आपला फायदा साधून घेणारे देखील असतात. लेखकाने यात मानवी मूल्यांचा विसर पडून स्वार्थासाठी काम करणारे सरकारी बाबू, सामान्य माणूस आणि धूर्त राजकारणी यांच्या ढोंगीपणाकडे नेमकं बोट दाखवलं आहे. 

प्रशासकीय चुकांना पकडून वेठीस धरणारा लोकशाहीचा चौथा खांब, वरातीमागून घोडे यावे तसे आपत्तीनंतर होणारे पुढाऱ्यांचे दौरे, आपत्तीतही स्वार्थ साधू इच्छिणारे संधी साधू लोभार्थी (लाभार्थी नव्हे), अन या सगळ्यात भरीसभर म्हणजे आपत्ती काळात माया जमवणारे नोटसेवक (लोकसेवक नव्हे) या सगळ्यांचं उत्तम चित्रण यात लेखकानं केलं आहे. कादंबरी छोटी मात्र त्यातील छोटे छोटे प्रसंगही एक प्रशासकीय अधिकारी म्हणून आपल्याला बरंच काही शिकवून जातात. योगायोग म्हणजे ही कादंबरी जिच्या लग्नाच्यावेळी विकत घेतली, ती मैत्रीण देखील उपजिल्हाधिकारी आहे. आता कादंबरी वाचून झाल्यावर तिच्यासह महसूल, ग्रामविकास व नगरविकास विभागातील अधिकारी मित्रांनी विशेषतः आवर्जून ही कादंबरी वाचावी असं वाटतं.

#असंच_काहीतरी 
#Book_Review

Monday, March 16, 2026

Book Review : लेखकाची गोष्ट (विश्राम गुप्ते)


मराठी साहित्यातील नामांकित चार-दोन पुस्तकं वाचून आपण फार मोठे वाचक आहोत असं आपल्याला वाटत असतं.अस्सल वाचक इतका मर्यादित असू शकत नाही. वाचन ही लेखक होण्यासाठीची अनिवार्य पायाभरणी आहे. वाचन म्हणजे पेरणी तर लिखाण म्हणजे त्यावर आलेलं पिक. पेरणीशिवाय पिक येणं अशक्य. त्यामुळे भरभरून वाचल्यानंतरच लिहिता येतं. लेखक होणं म्हणजे काय? लेखक कसा धडपडतो? ह्या धडपडीतून कसा घडतो? ह्याचे मिश्किल आणि प्रवाही भाषेत शब्दबद्ध केलेले अनुभव म्हणजे 'लेखकाची गोष्ट' हे विश्राम गुप्ते यांचे पुस्तक. ही केवळ लेखक होण्यासाठीची मार्गदर्शन पुस्तिका नाही, तर लेखक होण्याआधी वाचक कसा घडतो आणि वाचनातून लेखक कसा घडतो याचं वास्तववादी वर्णन यात आहे. वाचकांच्या कोर्टात लेखकाने पारदर्शकपणे त्याचं आयुष्य खुलं केलं आहे. तसं पाहिलं तर हे लेखकाचं आत्मचरित्र वाटू शकतं, फक्त हे आत्मचरित्र लेखकाचा लेखक म्हणून प्रवास कसा झाला यावर भर देतं. लेखक होताना आधी वाचक म्हणून सुरु केलेला प्रवास. वाचन करताना इंग्रजी साहित्याची चव चाखून मराठी साहित्याचा आस्वाद घेताना इंग्रजी व मराठी साहित्याची होणारी तुलना असो किंवा वाचलेल्या विविध पुस्तकातील कथा सांगून त्यातून मिळालेला धडा असो. अतिशय विविधांगी असं अफलातून काहीतरी यात आहे हे पुस्तक वाचायला सुरु करताच लक्षात येतं. पुस्तक आपल्याला गुंतवून ठेवतं. लेखकाच्या वाचनाचं टप्पेनिहाय प्रवासवर्णन यात दिलेलं आहे. ते वाचून आपणही लेखकाचे सहप्रवासी होऊ लागतो. शेक्सपियर, लिओ टॉलस्टॉय, फियोदोर डोस्टोवस्की, म्युगल सर्वांटिस, अंतोन चेकॉव्ह, ही इंग्रजी लेखकं वाचल्यावर लेखक इंग्रजी व मराठी साहित्याची तुलना करतो व आपले काही निष्कर्ष नोंदवतो. इंग्रजी किंवा पाश्चात्य साहित्यव्यवहार वैश्विक आहे तर मराठी साहित्यव्यवहार कौटुंबिक आहे, हा महत्त्वाचा निष्कर्ष यात अधोरेखित करण्यासारखा आहे. वाचक म्हणून वाचलेल्या महत्वाच्या लेखकांच्या कलाकृतींबद्दल प्रसंगानुरूप सविस्तर लिहिलं आहे. मधल्या टप्प्यावर बाबा आमटे यांच्या संपर्कात येऊन समाजसेवेचे प्रयोग करण्याचे प्रयत्न, तसेच त्यानंतर कामगारांचा वकील म्हणून आलेले अनुभव देखील मांडले आहेत. त्यानंतर लेखक वाचकाकडून लेखकाकडचा प्रवास करु लागतो. लेखकाच्या प्रवासातील टप्पे, लेखक म्हणून तयार होताना वाट्याला येणारे सांगता ही येत नाही अन सहन ही होत नाही असे प्रसंग, लिखाण करताना करावी लागणारी कसरत, एखादं लिखाण केल्यावर त्याला दाद मिळण्याची अपेक्षा असताना मिळणारी उपेक्षा, हे सारं अतिशय बारकाईने अन ओघवत्या भाषेत मांडलेलं आहे. पुस्तक मराठी लेखकांसाठी जगण्याची मार्गदर्शक पुस्तिकाच आहे. लेखकाच्या भाषेत सांगायचं तर, लेखक होणं म्हणजे भानात येणं. लेखक होणं म्हणजे केवळ भाषा कमावणं नाही. लेखक होणं म्हणजे पर्सनल ओळखीपाळखी वाढवणं नाही. लेखक होणं म्हणजे सुहास्य वदनाने साहित्य क्षेत्रातल्या ज्येष्ठांना वंदन करणं नाही. लेखक होणं म्हणजे भोळ्याभाबड्या वाचकांमध्ये मिरवणं तर अजिबातच नाही. लेखक होणं म्हणजे स्वतःची जगण्याची व्हिजन शोधणं. स्वतःची दुर्बीण किंवा टेलिस्कोप तयार करणं. अनुभवांचं निरीक्षण करण्यासाठी स्वतःचं एक सूक्ष्मदर्शक यंत्र, म्हणजेच मायक्रोस्कोप शोधून काढणं. लेखक होणं म्हणजे सतत अस्वस्थ राहणं. लेखक होणं म्हणजे कुठेही, कधीच सुखी न वाटणं. एकंदरीत फक्त लेखक होण्यासाठीच नव्हे तर भानात येण्यासाठी आपल्यातल्या वाचकाला समृद्ध करण्यासाठी आवर्जून वाचावं असं पुस्तक. नक्की वाचा.

#असंच_काहीतरी 
#Book_Review 

Sunday, March 15, 2026

Book Review : सगळं उलथवून टाकलं पाहिजे (देवा झिंजाड)


जागतिकीकरणात माणसाच्या झालेल्या अगतिकीकरणाची गाथा, भाकरीलाच राम मानणाऱ्यांची व्यथा आणि हरवलेल्या हिरव्या बांगड्यांची कथा सांगणारे पुस्तक म्हणजे 'सगळं उलथवून टाकलं पाहिजे' हा देवा झिंझाड यांचा कवितासंग्रह. ह्या कविता संग्रहातील कविता तीन भागात विभागलेल्या आहेत. अगतिकिकरण, भाकरायण आणि हरवलेल्या हिरव्या बांगड्या. संग्रहातील पहिल्याच कवितेचं नाव फार रंजक आहे - टायघाल्या. हे वाचून गावाकडे सहज ओठांवर येणारी शिवी आठवते. 

अगतिक बळीराजाची तडफड कधीच कळत नाही, 

टायघाल्या लोकांना एसीत बसल्यावर, 

असं म्हणत कवि इथल्या व्यवस्थेला सणसणीत चपराक मारतो तेंव्हा 'टायघाल्या' ही फाटक्या कपड्यातल्या गावाने चकाकणाऱ्या शहराला घासाडलेली शिवीच वाटते आपल्याला.


सगळं उलथून टाकलं पाहिजे या कवितेत कवी, 

मध्यमवर्गीयांना वेळ नाही 

श्रीमंतांना गरज नाही 

गरिबाला भीती वाटते 

ज्याच्याकडे सगळं आहे त्याला लाज वाटते

कशी करणार आहे क्रांती 

अशा मन:स्थितीतला समाज?

असा प्रश्नही विचारतो अन स्वतः पासूनच आधी क्रांती झाली पाहिजे असं उत्तरही देतो. फक्त वेदनेचा बाजार नव्हे तर बाजाराची वेदना मांडण्याचे काम या संग्रहातील कवितेतून केलं गेलंय. 


गड्या आपला गाव बरा असं कितीही म्हटलं तरी गावात सगळं चांगलंच असतं असंही नाही. भावाभावाच्या वाटण्याचे वास्तव आपल्या 'वाटण्या' कवितेत मांडताना कवी म्हणतो, 

एक आईवर गेला एक बापावर गेला 

वाटणीच्या टायमाला लेक बायकोवर गेला


अशा वाटण्या वाटण्या होत आल्यात केवढ्या 

काही दिसांनी जमिनी होतील वाटाण्याएवढ्या 


कवीची नजर वास्तवावर आहे. म्हणूनच कवी फक्त शब्दाचे बुडबुडे न दाखवता सांगतो, 


कवितेत असून चालत नाही 

लेखात असून भागत नाही 

पाऊस नुसता मनात बरसून चालत नाही 

तो रानात पड़ावा लागतो


ऋतुंनी नुसतंच कवितेत

पानोपानी डोकावलं म्हणजे 

होत नसतात पिकं हिरवी


असा हा कवी या आधी कधी वाचला नाही. फेसबुकवरती बऱ्याच दिवसापासून ह्या संग्रहाबद्दल वाचत होतो. मात्र थेट संग्रह विकत घेऊन वाचला तेंव्हा पहिल्याच वाचनात हा माणूस आपला वाटला. बारीकसारीक गोष्टीचे सूक्ष्म निरीक्षण, अनुभवाचे बोल अन शब्दांना अंतरीची ओल याचा प्रत्यय देणारा असा हा कवितासंग्रह सर्वांनी आवर्जून वाचावा.

#असंच_काहीतरी 
#BookReview