Monday, January 19, 2026

प्रिय मास्तर


 प्रिय मास्तर,


बोबडं बोलत तो शाळेत आलाय. काही दिवसांनी तो स्पष्ट सुध्दा बोलु लागेलच. त्याला बोलणं आपोआप येईल तसं काय, कधी आणि कसं बोलावं हे आपोआप समजणार नाही. ते मात्र तुम्हालाच शिकवावं लागेल.

आज तो पहिल्यांदा शाळेत आलाय. त्याला शाळा म्हणजे काय हे सुद्धा नीट माहित नाही. तुम्ही 'तिला' शाळा म्हणालात म्हणून तो 'तिला' शाळा म्हणेल. आजपासून तुम्ही जे जे शिकवाल ते ते तो शिकेल. त्यामुळं आता खरी शाळा तुमची सुरु झालीये, असं म्हणायला हरकत नाही. मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही त्याला योग्य तेच शिकवाल. फक्त बाप म्हणून काही गोष्टी तुम्ही त्याला नक्की शिकवाव्यात असं वाटतं.


मास्तर,

त्याला शिकवा की माणूस बोलायला शिकला म्हणजे तो ओव्या ही शिकतो अन शिव्या ही, मात्र कधी काय बोलावं याचं ज्ञान आणि भान दोन्ही असावं माणसाकडे. जगातल्या मोठमोठ्या युद्धातल्या शस्त्रापेक्षाही शब्दाची धार जास्त असते त्यामुळे जमेल तेवढे जपवूनच वापरावेत शब्द.


त्याला सांगा, वायफळ बडबडीपेक्षा निश्चितच श्रेष्ठ असते मौन, पण म्हणून सदासर्वकाळ मौनच पाळावं, असंही नाही. कारण, विद्यावंतांचे मौन ही मुर्खांना मुकसंमती ठरते. तेंव्हा मौनाचे धडे देताना, एवढं ध्यानात नक्की असु द्या. 


त्याला हे समजवा की, काळ कृत्रिम बुद्धिमत्तेचा असला तरी भावनांचं कोडं उलगडत नाही कॉम्प्युटरच्या कुठल्याच कोडला. त्यासाठी त्यानं नैसर्गिक भावनिकता जपावी अन दुसऱ्याची व्यथा ही त्याला आपली वाटावी.


बाहेरच्या झगमगाटात एवढं लक्षात ठेव म्हणावं की, नेटवर्किंगच्या जमान्यात फेक सुद्धा असतं डीप, केवळ आपल्या आतला दिवाच असतो अस्सल दीप. बाहेर दिवे लावताना आतला दिवा तेवत ठेवण्याचं कसब त्याच्या अंगी नक्की रुजवा.


त्याला गणितातला काटकोन, लघुकोन, विशालकोन समजेलच हळू हळू. मात्र जगण्याचा दृष्टिकोन देखील त्याला समजला पाहीजे वाढत्या वयातच. तो नक्की समजून सांगा.


त्याला यश साजरं करायला शिकवा तसं शिकवा अपयश पचवायलाही, कारण यश-अपयश हे असतं भरती-ओहटी सारखं. आपण मात्र रहावं किनाऱ्यासारखं.


त्याला आवर्जून सांगा, रस्ते वेडेवाकडे असले तरी चालणं मात्र सरळमार्गीच असावं. त्यासाठी त्याला यशस्वीतांच्या सोबतच ऐकवा अपयशी माणसांच्या सुद्धा कथा.


मास्तर, 

नावावरून जात अन पोशाखावरून धर्म ओळखणं सोपं असतं. त्याला तुम्ही आतला माणूस ओळखायला शिकवा.


हे सगळं शिकताना, तो बरेच प्रश्न विचारेल तुम्हाला अन हैराण करेल, तेंव्हा तुम्हाला तो येडपटही वाटेल, मात्र वेड्यासारखे प्रश्न पडल्याशिवाय माणूस शहाणाही होत नाही. म्हणून, त्याला प्रश्न विचारायला ही शिकवा अन उत्तर शोधायला ही.


मास्तर,

मला विश्वास आहे, तुम्ही त्याला नक्की शहाणा कराल. तोही तसा हुशार आहेच. शिकेल सगळंच हळू हळू.


तुमचाच,

एक बाप

Saturday, January 17, 2026

मारेगाव (22/8/2024 ते 24/12/2025)


21 ऑगस्ट 2024 रोजी ऑन फिल्ड ट्रेनिंग स्वरूपात नियुक्तीचा आदेश आला अन मारेगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार सांभाळण्यास कळवण्यात आले. हा आदेश आल्यावर सर्वप्रथम मारेगाव आहे कुठे? हाच प्रश्न पडला. नंतर माहिती घेतल्यावर लक्षात आलं की नगरपंचायत असली तरी प्रशासकीय इमारत चांगली आहे, अन थोडं हायसं वाटलं. 22 तारखेला तिथे रुजू झालो. स्वतंत्र कार्यभार सांभाळण्याची ही सुरवात असल्याने प्रत्येक गोष्ट नीट पाहून, तपासूनच करावी लागणार होती हे निश्चित. पहिल्याची दिवशी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन चालू कामांचा आढावा घेतला. त्यादिवशी समजलं की बऱ्याच वर्षानंतर येथे पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाला आहे. त्यामुळे साहजिकच कर्मचाऱ्यांसह नागरिक व लोकप्रतिनिधी सर्वांच्याच आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. ह्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी सर्व यंत्रणा नीट समजून घेणे, अभ्यास करून प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक करणे गरजेचे होते, मात्र हे सगळं करण्यासाठी हाताशी कर्मचारी मोजकेच. अशा सगळ्या परिस्थितीत कार्य करणे तितके सोपे नव्हतेच. नावाला नगरपंचायत असली तरी जन मानसिकता मात्र ग्रामपंचायतीचीच आहे, हे लक्षात आले. अधिकारी होण्याआधी आपल्याला अधिकाऱ्यांकडून ज्या अपेक्षा होत्या, त्या अधिकारी झाल्यावर आपण लोकांच्या पूर्ण करायच्या हे ध्यानात ठेवूनच कामाला सुरवात केली. जॉईन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच शहरातून फेरफटका मारला अन कचरा संकलन व वाहतूक, तसेच इतर साफसफाई कशी चालते ते बघितले. साफसफाई योग्य पद्धतीने व ठरलेल्या वेळेत व्हावी यासाठी आवश्यक सूचना देखील दिल्या.


कार्यभार घेतल्यानंतर सर्वप्रथम कार्यालयीन शिस्त लावणे आणि उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळ पाळण्यासाठी तयार करणे, हे खरे पहिले काम होते. कर्मचारी मोजके आणि त्यातही मुख्यालयी थांबणारे अगदीच कमी. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेवर येण्यासाठी कधी प्रेमाने सांगून तर कधी वेळप्रसंगी कारवाई करून तयार केले. बऱ्याचदा नियमापेक्षा सवयी आणि परंपरा या फार जवळच्या असतात. नियम मोडण्यापेक्षा परंपरा मोडणे तसं कठीण काम परंतु प्रशासकीय शिस्त लागण्यासाठी, योग्य परंपरा निर्माण करण्यासाठी, वाईट पद्धती, परंपरा आणि सवयींना मोडणे आवश्यक होते. हे करताना कुठेही कर्मचाऱ्यांमध्ये द्वेष किंवा राग उत्पन्न होणार नाही याची देखील पुरेशी काळजी घेतली. कार्यालयीन शिस्त जेवढी महत्त्वाची तेवढेच कार्यालयातील वातावरण सौहार्द पूर्ण राहील याकडेही जातीने लक्ष दिले. कर्मचाऱ्यांचा मित्र मित्र बनून सर्वांच्या साथीने काम सुरू केले. नेमकं जॉईन केल्यानंतर एका महिन्यातच पीआयएल (PIL) 155 नावाचं वादळ सगळ्याच नगरपालिकांमध्ये घोंगावत होतं. पीआयएल (PIL) 155 म्हणजे अनधिकृत बॅनर, होर्डिंग यांच्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांनी कार्यवाही करावी, यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेली जनहित याचिका. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे सर्व यंत्रणा अतिशय दक्ष आहे. त्यातच नगरपरिषद संचालनालयाकडून याविषयी वारंवार आढावा घेतला जाणे, कारवाईसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश देणे चालू होते. खरंतर अनधिकृत बॅनर, होर्डिंग हे शहराचे विद्रूपीकरण करतातच त्यासोबतच यातून अप्रिय घटना/अपघात घडण्याच्या शक्यता पण वाढीस लागतात. हे सर्व लक्षात घेता शहरात अनधिकृत बॅनर, होर्डिंग लागू नये, याकडे विशेष लक्ष दिले. आरोग्य निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून अनधिकृत बॅनर, होर्डिंग वरती कारवाई केली. हे करताना सर्वप्रथम विश्वासात घेतले ते सर्व लोकप्रतिनिधींना. बॅनर, होर्डिंग लावण्यासाठी नगरपालिकेच्या विहित केलेल्या शुल्काचा भरणा करून विहित केलेल्या जागीच बॅनर, होर्डिंग लागले पाहिजेत याकडे आपण सगळ्यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांना समजावून सांगितले. याआधी अतिशय किरकोळ रक्कम भरून बॅनर लावण्याची परवानगी दिली जात होती. त्यात वाढ करण्यात आली . विनापरवानगी बॅनर लावल्यास ते बॅनर दुसऱ्या दिवशी काढले जाते, ही भीती निर्माण झाल्याने अनधिकृत बॅनर लागणे कमी झाले. लोक परवानगी घ्यायला तयार झाले. हे करताना काही लोकांच्या रोषाला देखील सामोरे जावे लागेल. परंतु प्रशासनात आपण सर्वकाळ सर्वांना समाधानी करू शकत नाही. योग्य गोष्ट केल्यानंतर सुद्धा सर्वांचे समाधान होते असं नाही त्यामुळे केवळ लोक समाधान हाच उद्देश न ठेवता योग्य व समाधानकारक असा मध्यम मार्ग प्रशासकांना निवडावा लागतो. 



स्वच्छता ही शहराची मूलभूत गरज असते. त्यासाठी शहराच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित केले. केवळ सांगून करून घेणे नाही तर स्वतः करून दाखवणे या मार्गाचा अवलंब करत शहर स्वच्छतेसाठी स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत विविध ठिकाणी स्वतः सहभाग घेऊन स्वच्छता मोहीम राबवली.

स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत सायकल रॅली, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, मॅरेथॉन अशा विविध स्पर्धांचे स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजन करण्यात आले. ह्या विविध उपक्रमात नागरिकांचा अपेक्षित सहभाग लाभला नाही परंतु अपेक्षा ठेवणं थांबणार नव्हतं आणि काम करणंही. माझी वसुंधरा 4.0 अभियानात नगरपंचायतीस विभाग स्तरावरील द्वितीय पारितोषिक मिळाले. या बक्षीस रकमेचा विनियोग करून शहर अधिक स्वच्छ सुंदर आणि समृद्ध करण्याचा निर्धार करण्यात आला. 


मधल्या काळात विधानसभा निवडणूक 2024 मध्ये वणी मतदारसंघासाठी निवडणूक कार्यात सहभाग घेण्याचा व काम करण्याचा अनुभव मिळाला. नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी विविधांगी व नावीन्यपूर्ण काम करण्याची इच्छा मनात होतीच. त्यातच राज्य शासनाचा शंभर दिवसाचा अजेंडा घोषित झाला आणि त्या अंतर्गत विविध पैलुंवरती काम करण्याचे शासनाने निर्देशित केले. शासनाच्या निर्देशाला आपल्या कल्पकतेची जोड देत विविध अभिनव उपक्रम यशस्वीरित्या राबवले. 

परिविक्षाधीन कालावधी असल्याने येथे कमी कालावधी मिळणार हे निश्चित होते, तरीदेखील आपल्या अल्प कालावधीत अनेक महत्वाची कामे पार पडल्याचे समाधान निश्चित आहे. काही कामांचा उल्लेख करण्याचे टाळता येत नाहीये;
1) प्रभाग क्रमांक 17 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज नगर उद्यान व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर वाचनालयाचे रखडलेले काम पूर्ण झाले. अभ्यासिकेसाठी स्वसंकल्पनेतून प्रवेश परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला.
2) स्ट्रीट लाईट पोल बसवण्याचे तब्बल पाच कोटी रुपयांचे दोन वर्षांपासून रखडलेले काम सुरू करून अंतिम टप्प्यात आणले.
3) माझी वसुंधरा अभियानात नगरपंचायतीस विभाग स्तरावरील 50 लक्ष रुपयाचे द्वितीय बक्षीस प्राप्त झाले.
4) नगरपंचायतकालीन प्रथम कर आकारणी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली, ज्यामुळे नगरपंचायतीच्या कर मागणीत दुप्पटीची वाढ झाली.
5) खापरी येथे घनकचरा व्यवस्थापनाच्या कामासाठी ओल्या कचऱ्याच्या प्रक्रियेकरिता बावीस लाख रुपयाचे काम चालू आहे.
6) खापरी येथील घनकचरा व्यवस्थापनाच्या जागेला सुरक्षारक्षक भिंत बांधण्यासाठी 75 लाख रुपयेचे काम चालू आहे.
7) शहरातील मोकाट जनावरांचा त्रास कमी करण्यासाठी कोंडवाडा सुरू करून जनावरांना कोंडवाड्यात टाकण्यात आले.
8) मोकाट कुत्र्यांचा त्रास कमी करण्यासाठी कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात आले.
9) महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.
10) हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या श्रीनगर येथील सैनिकांना पाठवल्या.

राबवलेले विविध नावीन्यपूर्ण उपक्रम :
1) मुख्याधिकारी आपल्या दारी : नागरिकांशी थेट संवाद व त्यांच्या समस्याचे तातडीने समाधान शोधण्याचा प्रयत्न,
2) मुख्याधिकारी यांचा वर्ग : शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच शालेय प्रशासनाच्या अडचणी समजून घेतल्या,
3) "कर भरणा करा व ध्वजारोहणाचे मानकरी व्हा" उपक्रम : कर वसुलीत वाढ झाली तसेच सामान्य नागरिकास ध्वजारोहणाचा मान मिळाला,
4) मासिक उत्कृष्ट कर्मचारी : कार्यालयीन कामात गतिमानता आली तसेच कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले व 
5) एक दिवसीय मुख्याधिकारी : महिला दिनानिमित्त महिला कर्मचाऱ्यास मुख्याधिकारी पदी विराजमान केले.
  
हे सर्व करताना आवर्जून उल्लेख करायला हवा तो म्हणजे माझे सर्व सहकारी कर्मचारी यांचा. त्या सर्वांनी माझ्या प्रत्येक संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी अत्यंत मेहनत घेतली. एक वर्षापूर्वीची मारेगाव नगरपंचायत आणि आजची नगरपंचायत, यात जो काही बदल दिसतोय, तो केवळ सर्वांच्या संघभावनेने काम करण्यामुळेच. यासोबतच लोकप्रतिनिधींची साथ देखील अतिशय महत्वाची होती. चांगल्या सवयीची बीजं पेरून ती अंकुरली तितक्यात निघालोय, मात्र अपेक्षा आहे, ही रोपे जोपासली जातील आणि यांचा लवकरच वटवृक्ष होईल. त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 


बा. भ. बोरकरांच्या शब्दात शेवटी एवढेच,
हलके काढून कंटक पायींचे
स्वरांत विणिले सर मीं स्वप्नांचे
हासत दु:खाचा केला मी स्वीकार
वर्षिलें चादंणें पिऊन अंधार
प्रकाशाचें गाणें अवसेच्या रात्रीं
आनंदयात्री मी आनंदयात्री.

होय, मी आनंदयात्री! हा प्रवास असाच चालू राहील. ह्या घरातून त्या घराकडे. मात्र, जिथे राहू तिथे उजेड देऊ. एक शायर म्हणतोच ना,
जहां रहेगा वहीं रोशनी लुटाएगा 
चिराग का अपना मका नहीं होता !!

पुढील स्टेशन - अकोट 

#असंच_काहीतरी 
#मारेगाव

नाव


 

माणुस बरा की किडा ?


 

आणीबाणी


 

कोजागिरी


 

Saturday, August 23, 2025

प्रिय बैलोबा

 

प्रिय बैलोबा 


असं आश्चर्यचकित काय झालास ? वाघाला वाघोबा म्हटलेलं ऐकलं असेल पण तुला कधी बैलोबा कुणी म्हटलं नाही म्हणून की सतत काठीनं तुझ्याशी बोलणारी माणसं कधी प्रेमाने पत्रातून सुद्धा तुझ्याशी बोलतील असं वाटलं नव्हतं म्हणून ? अरे, जसे सारेच बैल काही मारके नसतात, तसं सारीच माणसंही.... तर ते जाऊ दे.. सर्वप्रथम तुला पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. नाही म्हणजे आजच्याच दिवस तुला पोळी मिळणार हे माहित आहे, पण किमान आजच्या दिवस तरी मिळते ना, म्हणून आनंदी हो बाबा.


तुझा माझा परिचय तसा जुनाच. अगदी लहानपणी तुला गोठ्यात पाहून दई बघ दई, असं म्हणत घरच्यांनी तुझी मला ओळख करून दिली तेंव्हापासून आपण एकमेकांना ओळखतो. त्यानंतर खेळण्यातही तू आलास... कधी लाकडी, तर कधी मातीचा....पोळा जवळ आला की कुंभार कधी बैलं आणून देतो, असं व्हायचं... एकदा ते मिळाले की बाप तुला सजवायचा, तसं मी त्या मातीच्या बैलाला.... तू असा सोबतच राहिलास... पुढे पुढे ही ओळख वाढत गेली...अन जवळीक ही. शाळेत मास्तर म्हणायचे, आपण पूर्वी माकड होतो, आपल्याला पण शेपटी होती, तेंव्हा घरी येऊन तुझ्या शेपटीला वारंवार हात लावून बघायचो. कदाचित तू ही पुढे माणूस होशील, असा मनात विचार करायचो. कधी तूझी शेपटी हाताने पिरगाळत तुला पिटाळण्याचाही प्रयत्न करून पाहिला. तुझ्या खोड्या काढतच बालपण सरलं.


वय वाढलं, शाळा सुटली, पाटी फूटली... अन बघता बघता माझ्या हाती कासरा आला... तुझी वेसण माझ्या हाती आली. तुझ्या मानेवर माझं जू अन माझ्या मानेवर घराचं...तसं आपण दोघेच खरे एकमेकांचे मित्र...दोघांनाही मुकाट्याने भार सोसावा लागतो.. तुला गाडीचा अन मला गाड्याचा... तुझ्याशिवाय बैलगाडी ठप्प अन माझ्याशिवाय घरगाडा.. तरीदेखील आपण इतरांसाठी निर्बुद्धच... आपणच खरे कृषी संस्कृतीचे शिलेदार... पण हल्ली कृषीकडे लक्ष आहेच कुणाचं...? पर्यायाने आपण दोघेही दुर्लक्षितच... मोठ मोठी यंत्र आणून शेतीतून तुला हद्दपार केलं जातंय... तसं शेतमाल परदेशातून आयात करून मलाही... दलाल स्ट्रीट वरील बैलाने उसंडी मारली की शेयर बाजार तेजीत असतो म्हणे...त्या पुतळ्याचं जेवढं कौतुक आहे, तेवढंही आपलं नाही बाबा...कित्येक बैलं इकडं वीज पडून मरतात, पुरात वाहून जातात त्याचं काय ? त्या शेतकऱ्यांचं काय ? पोटच्या लेकरावाणी तुला जपतो रे आम्ही...हा आता एक दिवस कौतुक करायचं अन दुसऱ्यादिवशी पुन्हा तेच जू, तीच गाडी, तोच खेळ. हे बी समजतंय मला... पण हे असंच चालूये, तुझा खेळ अन शेतीचा खेळ खंडोबा... त्यात मी तरी काय करणार...


तू कायम जवळचा का आहेस माहित आहे ? लहानपणी खेळण्यातला बैल, शाळेत गेल्यावर बैल हायीस का रे म्हणत एकमेकांचा उद्धार करताना परत तूच... कधी एखाद्याला निर्बुद्ध म्हणतानाही हमखास बैलबुद्धी शब्द सूचायचा...पुढं लग्न झालेल्यांबाबत बायकोचा बैल असं ऐकताना परत तूच... इतकंच कशाला, आमच्या म्हणीतून देखील तूच डोकावतोस... जसे, "अतिशहाणा त्याचा बैल रिकामा" किंवा "बैल गेला अन झोपा केला", यासारख्या ग्रामीण म्हणीतही तूच...आमच्या यत्र, तत्र, सर्वत्र तूच तू व्यापून राहिलास. ग्रामीण व कृषी संस्कृतीचे खरे वारसदार आपणच...आपला फक्त एक दिवस नसतो... आपलं महत्व इतरांना फक्त एक दिवसच समजतं, हिच आपली शोकांतिका. असो, आपणच एकमेकांना आधार दिला पाहिजे... तूच माझा खरा मित्र आहेस... तुझ्याशिवाय माझ्या शेतीचं काय खरंय ? माझं काय खरंय ? हा जगाचा पोशिंदा तुझ्याशिवाय पोशिंदा कसा होऊ शकेल... कितीही यंत्र आली तरी माझं दुःख ऐकायला सध्या तरी कारभारणी नंतर तूच एकमेव आहेस... त्यामुळे तू माझ्यासाठी फक्त बैल नाहीस... माझ्या दावणीला बांधलेला माझा सच्चा दोस्त...माझा बैलोबा आहेस... बैलोबा... लव्ह यु बैलोबा.


तुझाच आणि फक्त तुझाच,

शेतकरी