एखाद्या सिनेमाबद्दल लिहावं वाटणं तसं फार दुर्मिळच. दुर्मिळ यासाठी की मी काही चित्रपट समीक्षक नाही किंबहुना कसलाच समीक्षक नाही. फार पूर्वी स्लॅम बुक या मराठी चित्रपटाबद्दल लिहिलं होतं त्यानंतर सत्यशोधक या चित्रपटाच्या निमित्ताने काही मनातलं कागदावर उतरवलं होतं, त्यानंतर आता परत एक अप्रतिम सिनेमा पाहण्यात आला आणि साहजिकच काही लिहावंसं वाटलं. आजूबाजूच्या अवास्तव, रोमँटिसिझम जपणाऱ्या काळात अस्सल, दर्जेदार आणि वास्तववादी कथा पडद्यावर साकारणं तसं जिकिरीचं आणि हल्ली दुर्मिळ काम, परंतु 'आता थांबायचं नाही' या सिनेमाच्या रूपात दिग्दर्शकांनी हे जिकिरीचं काम अतिशय अप्रतिम पद्धतीने पार पाडलय. कथा, संवाद, संगीत, अभिनय साऱ्याच पातळीवर सिनेमा परिपूर्ण भासतो. बीएमसीचे सहायक आयुक्त उदयकुमार शिरूरकर यांच्या दृढ निश्चयातून रात्र शाळेसारख्या उपक्रमामधून शिकणाऱ्या सफाई कामगारांची ही कथा. 2016 साली बीएमसीचे एकूण 23 चतुर्थ श्रेणी कर्मचारी दहावी पास झाले. हिच गोष्ट या सिनेमाच्या निमित्ताने रंगीत पडद्यावर आली आहे. परंतु ही फक्त सफाई कामगारांची कथा नाही तर त्यांची व्यथा देखील आहे. अल्प पगारात काम करणारा शिक्षक, सुरक्षा साधनांशिवाय काम करणारे सफाई कामगार, घर चालवण्यासाठी तीन-तीन शिफ्ट मध्ये काम करणारा मुंबईतला माणूस, अशा सगळ्यांच्या वेदनेकडे हा सिनेमा अंगुलीनिर्देश करतो. एखादा अधिकारी ठरवून बदल कसा करू शकतो याचं उदाहरण यात बघायला मिळतं. अतिशय छोट्या छोट्या प्रसंगातून महत्त्वाच्या बाबींवर मार्मिक पद्धतीने भाष्य सिनेमात केलं गेलंय. सिनेमा हसवतो, रडवतो, समजावतो अन प्रेरितही करतो. अतिशय अप्रतिम कलाकृती प्रेक्षकांना उपलब्ध करून देणाऱ्या सर्व टीमचे मनापासून अभिनंदन तथा आभार.
#Movie #Review #MarathiMovie
No comments:
Post a Comment