Sunday, March 15, 2026

Book Review : सगळं उलथवून टाकलं पाहिजे (देवा झिंजाड)


जागतिकीकरणात माणसाच्या झालेल्या अगतिकीकरणाची गाथा, भाकरीलाच राम मानणाऱ्यांची व्यथा आणि हरवलेल्या हिरव्या बांगड्यांची कथा सांगणारे पुस्तक म्हणजे 'सगळं उलथवून टाकलं पाहिजे' हा देवा झिंझाड यांचा कवितासंग्रह. ह्या कविता संग्रहातील कविता तीन भागात विभागलेल्या आहेत. अगतिकिकरण, भाकरायण आणि हरवलेल्या हिरव्या बांगड्या. संग्रहातील पहिल्याच कवितेचं नाव फार रंजक आहे - टायघाल्या. हे वाचून गावाकडे सहज ओठांवर येणारी शिवी आठवते. 

अगतिक बळीराजाची तडफड कधीच कळत नाही, 

टायघाल्या लोकांना एसीत बसल्यावर, 

असं म्हणत कवि इथल्या व्यवस्थेला सणसणीत चपराक मारतो तेंव्हा 'टायघाल्या' ही फाटक्या कपड्यातल्या गावाने चकाकणाऱ्या शहराला घासाडलेली शिवीच वाटते आपल्याला.


सगळं उलथून टाकलं पाहिजे या कवितेत कवी, 

मध्यमवर्गीयांना वेळ नाही 

श्रीमंतांना गरज नाही 

गरिबाला भीती वाटते 

ज्याच्याकडे सगळं आहे त्याला लाज वाटते

कशी करणार आहे क्रांती 

अशा मन:स्थितीतला समाज?

असा प्रश्नही विचारतो अन स्वतः पासूनच आधी क्रांती झाली पाहिजे असं उत्तरही देतो. फक्त वेदनेचा बाजार नव्हे तर बाजाराची वेदना मांडण्याचे काम या संग्रहातील कवितेतून केलं गेलंय. 


गड्या आपला गाव बरा असं कितीही म्हटलं तरी गावात सगळं चांगलंच असतं असंही नाही. भावाभावाच्या वाटण्याचे वास्तव आपल्या 'वाटण्या' कवितेत मांडताना कवी म्हणतो, 

एक आईवर गेला एक बापावर गेला 

वाटणीच्या टायमाला लेक बायकोवर गेला


अशा वाटण्या वाटण्या होत आल्यात केवढ्या 

काही दिसांनी जमिनी होतील वाटाण्याएवढ्या 


कवीची नजर वास्तवावर आहे. म्हणूनच कवी फक्त शब्दाचे बुडबुडे न दाखवता सांगतो, 


कवितेत असून चालत नाही 

लेखात असून भागत नाही 

पाऊस नुसता मनात बरसून चालत नाही 

तो रानात पड़ावा लागतो


ऋतुंनी नुसतंच कवितेत

पानोपानी डोकावलं म्हणजे 

होत नसतात पिकं हिरवी


असा हा कवी या आधी कधी वाचला नाही. फेसबुकवरती बऱ्याच दिवसापासून ह्या संग्रहाबद्दल वाचत होतो. मात्र थेट संग्रह विकत घेऊन वाचला तेंव्हा पहिल्याच वाचनात हा माणूस आपला वाटला. बारीकसारीक गोष्टीचे सूक्ष्म निरीक्षण, अनुभवाचे बोल अन शब्दांना अंतरीची ओल याचा प्रत्यय देणारा असा हा कवितासंग्रह सर्वांनी आवर्जून वाचावा.

#असंच_काहीतरी 
#BookReview
 

No comments: