Monday, February 19, 2024

Book Review : सेल्फी (अरविंद जगताप)


आपल्या आजुबाजुला इतकं काही काही चालु असतं, पण आपण मात्र कायम स्वतःत रंगलेले, आत्ममग्न असतो....कदाचित नव्या युगातील वाढत्या सेल्फिशपणाकडे बोट दाखवण्यासाठीच तर सेल्फीचा शोध लागला नसेल ? असेलही कदाचित्... कारण पुर्वी मागच्या कॅमेऱ्याने जगाकडे बघायचो आपण... आता मात्र कॅमेरा समोर आला अन् आपण मात्र समोर बघणं सोडून स्वतःलाच बघत बसू लागलो... अशावेळी आपल्या भोवतालच्या जगाकडे उघड्या डोळ्यांनी बघून आत्मचिंतन करायला लावणाऱ्या लेखांचा संग्रह म्हणजे अरविंद जगताप यांचे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक 'सेल्फी'.... हे पुस्तक म्हणजे तरुणाईच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न आहे... वेळोवेळी तरुण पिढीसाठी लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह आहे...पुस्तक अगदी छोटेखानी आहे...तसेच पुस्तकातील लेख देखील छोटे छोटे आहेत...एक पानी, दोन पानी असे हे लेख आहेत...काही लेखात एखादी‌ लक्षवेधुन घेणारी कथा आहे, तर एखादा लेख हीच लघुकथा आहे...पुस्तकात बादशाहचा कुत्रा ही छोटीशी कथा आहे...या कथेत बादशाहच्या लाडक्या कुत्र्याच्या अंत्ययात्रेत लाखो लोक सहभागी होतात, मात्र काही काळाने युद्धात राजा राज्य हरतो, कर्जबाजारी होतो अन् एका जुन्या घरात मरण पावतो, कुणाला माहीतही होत नाही...ज्याच्या कुत्र्याच्या अंत्ययात्रेस लाखो जमतात, त्याच्या स्वतःच्या मरणाचा कुणाला सुगावाही लागत नाही.…सत्ता संपते तेंव्हा सारे संपते...त्यामुळे सत्तेत‌ असताना आत्मपरिक्षण आवश्यक आहे हा मोलाचा संदेश कथेतुन लेखक देऊन जातो...सोबतच एकदा आपण कुणाला आपल्या मेंदुचं राजा मानलं की आपल्यावर राज्य आलेलं असतं...हे देखील लेखक स्पष्टपणे सांगतो...पुस्तकात 'कवी' नावाची एक कविता आहे...ह्या कवितेतुन लेखकाने कागदावर कविता करण्यापेक्षा झाडं लावणं गरजेचं आहे हे अगदी निक्षुन सांगितले आहे...कवितेचा कवि झाडाला पुस्तकं म्हणतो अन् हिरव्यागार कवितेसाठी ह्या पुस्तकाची पानं चाळायला हवीत असा संदेश देतो....पुस्तकात राजकीय, सामाजिक विषयांवर लेख आहेत...तरुणाईला सेल्फीश न होता सेल्फ अनॅलिसीस करायला लावणारे हे पुस्तक तरुणाईने नक्कीच वाचायला हवे...आपण आपली काढलेली सेल्फी कुठल्याही फिल्टर शिवाय कदाचित आपल्याला आवडणार नाही, पण लेखकाने लिहीलेली ही सेल्फी पाहायला आणि वाचायलाही आवडेल अन् आपल्या बुक सेल्फ मध्ये कायम ठेवावी वाटेल....


#असंच_काहितरी
#Book_Review

सवाल एकच रोजीरोटी


 

पोळलेला पावसाळा


 

Sunday, February 11, 2024

Book Review : तुकाराम (भालचंद्र नेमाडे)


तुका न उमजलेले कोडे आहे

जितके वाचू तितके थोडे आहे

नेमाडपंथीय शैलीतील तुकाराम म्हणजे तुकारामावरचे अकृत्रिम प्रेम, अन् तुकारामाच्या जीवनाचा त्याच्याच अभंगाच्या आधारे थोडक्यात घेतलेला आढावा...तुकाराम अभंग आहे, म्हणुनच आजही कित्येक शतकांनंतरही सामान्य माणुस त्याच्यात दंग आहे....तुकाराम जितका आपला वाटतो तितकं आपलेपण इतर कुणाबद्दलही क्वचितच् वाटतं...नेमाडेंनी ह्या आपल्या छोट्याशा पुस्तिकेत तुकारामाच्या जीवनाबद्दल व तत्कालिन परिस्थितीबद्दल लिखाण केलेले आहे...तुकारामाच्या कवितेच्या आधारे त्याचे संतत्व अन् कवित्व उलगडले आहे...त्यासोबतच तुकारामाचे साहित्यातील अमुल्य योगदान व मराठी भाषेवरचे उपकार विषद केले आहेत...तुकारामावर त्याच्या अभंगावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने एकवेळ तरी वाचावे असे पुस्तक म्हणजे भालचंद्र नेमाडे यांचे 'तुकाराम'.

#तुकाराम
#नेमाडे
#असंच_काहितरी
#Book_Review

Sunday, January 14, 2024

निमित्त : सत्यशोधक (सिनेमा)

 

प्रत्येक समाजसुधारक हा त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीचे अपत्य असतो...फुले हे देखील त्याला अपवाद नव्हते...मागासलेला, अज्ञानात खितपत पडलेला, मनुस्मृति ला प्रमाण मानणारा, बुद्धीप्रामाण्यपेक्षा ग्रंथप्रामाण्याला महत्व देणारा अन् सगळे असुनही हे सगळे चुकीचे आहे हे माहीत नसणारा भारतीय समाज ही अगदी विसाव्या शतकापर्यंतची परिस्थिती होती....बाहेरुन आलेल्या इंग्रजांनी, पाश्चात्य शिक्षणाने आपल्याला या चुकांची जाणिव करुन दिली, अर्थात् यात त्यांना भारतीयांचा पुळका होता असे मुळीच नाही तर त्यात त्यांचे हित होतेच...त्यांना रंगाने भारतीय पण संस्कृतीने पाश्चात्य समाज घडवुन आपल्या देशातील उत्पादनांसाठी ग्राहक तयार करायचे होते....पण एकमात्र चांगले झाले, त्यामुळे समाजसुधारकांची एक मोठी फळीच निर्माण झाली....ह्या सर्वच समाजसुधारकांनी तत्कालिन समाजात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला....आपण त्यांच्या प्रयत्नांचे ऋणी आहोत..त्यांचे कष्ट, त्याग, संघर्ष हे प्रेरणादायी आहेतच....पण आजचा समाज तसा राहिला नाही, त्यामुळे आज जर हेच इतिहासातले समाजसुधारक वर्तमानात असते तर त्यांचे वर्तन निश्चित वेगळे असते, याचे भान असायला हवे...आगरकर म्हणायचे पाश्चिमात्यांचे अनुकरण करा, अंधानुकरण नको...आगरकांचे हे शब्द आजही तितकेच लागू होतात...फक्त आता पाश्चिमात्याच्या ठिकाणी सिनेमातल्यांचे असे म्हणावे लागेल. कारण दोन तासाचा सिनेमा बघुन आपल्या मनात येणारे असंख्य विचार आपल्याला एकाच वेळी महात्मा फुले व्हायला हवं असं सांगतात तर दुसरीकडे कृष्णराव भालेकरांची दिवाळखोरी व्यवहाराची आकडेमोड डोक्यात जागी करते...डोक्यात काहीच स्पष्ट नसते तरी आपण फुले किती भारी होते असं म्हणुन त्यांना टोकाचं देवत्व बहाल करतो अन् संपलेल्या पाॅर्पकाॅर्नसोबत आपल्यातले फुले सिनेमाघराच्या पायरीवरच सोडुन निघुन येतो..थोडक्यात सिनेमातुन मिळालेली प्रेरणा घरी येईपर्यंतही टिकत नाही...टिकलीच तर त्यात फक्त काहीतरी करायला हवं..हाच विचार सतत पिंगा घालत असतो..नक्की काय करावं ? आज समाजाला कशाची आवश्यकता आहे ? अन् मुळ प्रश्न म्हणजे कसं करावं ? या प्रश्नांचा आपण फारसा विचारच करत नाही. 

आता थोडक्यात सत्यशोधक महात्मा फुले यांच्याविषयी समजुन घेऊया -

फुले हे पुरोगामी विचारांचे खंदे पुरस्कर्ते होते...त्यांनी चातुर्वर्ण्य व्यवस्था, धर्मातील कर्मकांड, समाजातील स्त्रीची अवस्था, कुप्रथा, परंपरा ह्या सगळ्यांवर आसुड उगारला...ब्राह्मणीव्यवस्थेचे कसब लोकांना दाखवुन सलामी ठोकत गुलामी करणाऱ्यांना इशारा दिला..... शेतकरी हा कसा प्रस्थापित राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील पुढाऱ्यांकडून दुर्लक्षीत राहिला हे दाखवुन दिले...धर्मातील सत्य शोधण्याचा प्रयत्न करत सार्वजनिक सत्यधर्म निर्माण केला...हे सगळे करताना एक मात्र खरे की फुले हतबल झाले नाहीत...उठतो अन् आता समाजसुधारणा करतो...खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा असा आव न आणता समाजसुधारणा करण्यासाठी आवश्यक असणारे आर्थिक पाठबळ कमावले, राजकीय लढ्यापेक्षा सामाजिक लढा महत्वाचा आहे हे अधोरेखित करताना राजकीय पद (पुण्याचे नगरसेवक) भुषवुन प्राधिकार मिळवले....वस्ताद लहुजी साळवेंच्या तालमीत शरीर बनवले...थोडक्यात शारिरीक, राजकीय, तथा सामाजिक अशा सर्वच स्तरावर स्वतःला सिद्ध केले अन् सोबत समाजसुधारण्याचे कामही...यातुन शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे फुल्यांकडे फक्त मोठ-मोठे विचार नव्हते, तर सोबतच कृतीही तशी होती, विचारांना कृतीशील आधार होता...शाळा चालवायचा विचार होता, पण शाळेत अडचण आली तर दोन हात करण्याची तयारी होती....बालहत्याप्रतिबंधक गृह सुरु करण्याचा विचार होता, सोबतच बालकांना सांभाळण्याची कुवत होती... दलितांना हक्काचे पाणी मिळावे हा विचार होता, तर त्यासाठी स्वतःच्या घरातला हौद खुला करण्याची धमक होती....सामाजिक सुधारणेकरिता आर्थिक पाठबळ हवे, हा विचार होता तर त्यासाठी कंत्राटी काम घेऊन पैसा जमवण्याचे कसब होते...या सगळ्यांच्या मुळाशी असणारी गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट करायची तर का करायची ? अन् कशी करायची याची स्पष्टता होती..सिनेमात कृष्णराव भालेकर निबंधमालेच्या लेखांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपणही वृत्तपत्र काढावे असा आग्रह धरतात तेंव्ह फुले स्पष्टपणे विचारतात की वृत्तपत्र काढुन काय करायचे ? ज्यांच्यासाठी काढायचे त्यांना ते वाचता येत नाही, अन् ज्यांना वाचता येतं ते आपलं पत्र वाचणार नाहीत...त्यापेक्षा आपण आपली शक्ती लोकांना साक्षर करण्यात वापरु...ही स्पष्टता, असा स्पष्टवक्तेपणा अन् परखडता आपल्यात यावी यासाठी प्रयत्न करायला हवा....हेच ह्या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा वाटले..नव्हे तसे प्रयत्नपुर्वक करण्याचे धाडस ह्या सिनेमाने दिले.


सावधान पुढे धोका आहे 🔇

"सत्यशोधक" सिनेमा पाहुन तुम्हालाही समाजसुधारक व्हावं वाटलं असेल तर थांबा...दिर्घश्वास घ्या अन् एकवेळ स्वतःला विचारा की हे जे समाजसुधारण्याचे, सामाजिक कार्याचे स्वप्न मी पाहतो आहे हे मी कसे पुर्ण करु शकेल ? यासाठी लागणारी विचारातील स्पष्टता माझ्यात आहे का ? असेल तर पुढचा टप्पा म्हणजे ह्या विचारांना सत्यात आणण्यासाठी मी कितीसा सक्षम आहे ? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं समाधानकारक असतील तर नक्कीच समाजसुधारण्यासाठी काकणभर का होईना आपण आपलं योगदान नक्की द्यायला हवं....मात्र आपल्याकडे बऱ्याचदा फक्त उद्दात्त विचार असतात, पण त्यासाठी आवश्यक पाठबळ नसते...त्यामुळे आपण विचारक होऊ शकतो मात्र सुधारक नाही....सुधारक होण्यासाठी विचारांना कृतीचं पाठबळ हवं, कृतींना खंबीर आधार हवा ...अन् त्यासाठी समाजसुधारण्या आधी वैयक्तीक बलस्थानं अधिक बळकट करायला हवीत...सुरवात स्वतःत सुधारणा करण्यापासुन व्हायला हवी....समाजसुधारणेची हिच तर पहिली पायरी आहे...नाही का ?


#असंच_काहितरी

Wednesday, January 10, 2024

Book Review : लढणाऱ्यांच्या मुलाखती (उत्तम कांबळे)


आपल्या देशात हिमालया इतक्या उंचीची अन् तितक्याच खोलीची असंख्य माणसं जन्माला आली...सगळीच काही आपल्याला परिचीत असतातच असे नाही, पण आपल्या ऐकण्यात, वाचण्यातही अशी माणसे आली तर त्यांच्याकडुन नक्कीच खुप काही शिकायला मिळतं...जगण्याची नवी दृष्टी मिळते...ह्या माणसांचे आयुष्य, त्यांचे जगणे वाचल्यावर कळते की आयुष्यात किती उंची गाठता येते याला काही मर्यादा नसते....माणुस अमर्याद मोठा होऊ शकतो...फक्त प्रसिद्ध होणं म्हणजे मोठं होणं नाही तर आपल्याला हव्या त्या क्षेत्रात सर्वोत्तम करुन दाखवणं म्हणजे खरंतर मोठं होणं..अशी मोठी माणसं काही सहजासहजी तयार होत नाहीत...परिस्थितीच्या भट्टीत भाजुन निघणारी माणसंच पुढं यशाचा डंका वाजवुन दाखवतात...यशोशिखरावर पोहचल्यावर जो तो कौतुक करु लागतो, पण तिथपर्यंत पोहचताना किती पायवाटा पायाखाली घातल्या, किती काटे रुतले, कितीदा रक्तबंबाळ झालो, कितीदा हताश होऊन क्षणभर थांबलो, अडखळलो, पडलो, रडलो तरी चालत राहिलो, कितीदा उपहास सहन केला हे सगळं कुणाला दिसत नाही...मात्र हे सगळं सहन केल्याशिवाय, लढल्याशिवाय यशोशिखरावर पोहचताही येत नाही....अशा मोठ्या माणसांशी भेटता येणं हे ही भाग्यच...पण जेंव्हा त्यांची भेट अशक्य असते तेंव्हा पुस्तकं घडवतात भेट अशा माणसांची...अन् पुस्तकातुन ही माणसं आपल्याला भेटतात, त्यांचा संघर्ष समजतो, त्यांची लढाई कळते, त्यांच्या वाट्याला आलेल्या खाचखळग्यांना त्यांनी कसं पार केलं, हे सगळं वाचायला मिळतं, तेंव्हा पुस्तकाच्या पानातुन जणु ही माणसंच आपल्याशी बोलत असतात....बरेच काही सांगतात, बरेच काही समजावतात, मनातल्या विचारांना दिशा देण्याचं काम ही करतात...

अशीच तीन मोठी माणसं (लेखकासह चार) लढणाऱ्यांच्या मुलाखती या पुस्तकातुन आपल्याला भेटतात...ह्या देशाला जशी नाथांची परंपरा आहे तशीच अनाथांची पण आहे, अन् त्याच परंपरेतील ज्यांना स्वतःचे नाव, गाव काहीच नव्हते, ज्यांनी स्वतःबद्दल लिहिताना कवितेतही लिहीलय की,


ना घर होते ना गणगोत
चालेल तेवढी पायाखालची जमीन होती
दुकांनाचे आडोसे होते
मोफत नगपालिकेचे फुटपाथ
अशा देण्यात आलेला उठवळ आयुष्याची....

मात्र पुढे ज्यांनी आपले कवितेचे एक गाव नव्हे तर महानगरच वसवले अन् साहित्यक्षेत्रात स्वगःचे नाव अगदी अजरामर करुन ठेवले असे पुस्तकातील पहिले व्यक्ती म्हणजे कविवर्य नारायण गंगाराम सुर्वे...जन्म दिलेले आई, वडील नाही...ज्यांनी सांभाळलं त्यांनीही एका टप्प्यावर आता तु तुझं बघ म्हणुन सोडुन दिलेले..मात्र अशाही परिस्थितीत शिपाई, शिक्षक ते कामगार चळवळीतील लढ्यापर्यंत ते लढत राहिले...कुठलीही तक्रार न करता...लाभलेले आयुष्य मिळालेल्या परिस्थितीत रडत पडत न जगता लढत लढत जगणं त्यांनी मान्य केलं..प्रचंड दर्जेदार लिहिलं, तरीही चांगलं लिहायचं राहुन गेलं इतका विनम्र भाव त्यांच्या ठायी दिसतो...त्यांच्याबद्दल, त्यांच्या कवितेबद्दल, त्यांच्या तत्वप्रणालीबद्दल, कामगार लढ्याबद्दल अन् एकंदरीतच समकालीन परिस्थितीबाबत त्यांना विचारलेले प्रश्न अन् त्याची उत्तरं आपल्याला यात वाचायला मिळतात.

पुस्तकात दुसरी मुलाखत आहे डाॅ. सुनिलकुमार लवटे यांची. सुनिलकुमार लवटे हे देखील कविवर्य नारायण सुर्वे यांच्याच परंपरेतील म्हणजेच अनाथ...पंढरपुरातील बालकाश्रमात वाढलेल्या लवटे यांच्याशी मारलेल्या गप्पा... त्यातुन त्यांचा जीवन संघर्ष व सोबतच त्यांचे अनाथपणा वा अनाथांबद्दलचे विचार, सोबतच कुमारी माता, विवाहपुर्व व विवाहबाह्य संबंध याबाबतचे विचार, हे पुस्तकातील दुसऱ्या टप्प्यावर वाचायला भेटतात.

पुस्तकातील तिसरी मुलाखत आहे डाॅ. रावसाहेब कसबे यांची... फारच वैचारिक व वाचनास प्रवृत्त करणारी....कसबे हे‌ जेष्ठ व श्रेष्ठ साहित्यीक, त्यांचे लिखाण व अभ्यास किती अफाट आहे याची जाणिव ह्या मुलाखतीमधुन होते....बुद्ध ते आंबेडकर व्हाया गांधी असा मुलाखतीचा प्रवाह आहे...मुलाखतीत बरीच वैचारिक चर्चा आहे...सामाजिक न्याय ह्या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवुन अनेक मुद्द्यांवर ह्यात चर्चा केलेली आहे...लोकशाही, समाजवाद, जागतिकीकरण ह्या विषयांची सर्वांगिण चर्चा आहे...वेळोवेळी रावसाहेबांनी दिलेले अनेक दाखले, उदाहरणं आपल्याला त्यांच्या वाचनाची विस्तीर्ण कक्षा तर दाखवतातच सोबतच आपल्याला अजुन खुप काही वाचायचं बाकी आहे, समजुन घ्यायचं बाकी आहे याचीही जाणिव करुन देतात...निम्म्या पुस्तकात कसबे यांची‌ मुलाखत आहे तर उर्वरीत‌ निम्म्या भागात इतर दोघांची मुलाखत व तत्पुर्वी मुलाखतीबाबतची लेखकाने दिलेली सिद्धांतिक माहिती आहे....

पुर्ण पुस्तक हे एकंदरीत मुलाखत काय असते ? कशी ह्यावी ? याचा वस्तुपाठ तर आहेच, पण लढणाऱ्या माणसांनी लढण्यासाठी दाखवलेली वाट देखील आहे.....अवश्य वाचावे असे.


#असंच_काहितरी
#Book_Review

Wednesday, January 3, 2024

Book Review : गजाआडच्या कविता (संपादन : उत्तम कांबळे)


तुरुंग व त्याविषयीच्या आपल्या कल्पना ह्या बहुधा चिञपट पाहुनच तयार झालेल्या असतात...प्रत्यक्ष तुरुंग काही पाहिला नसेल तरीपण तुरुंगातल्या कैद्याबाबत सर्वसाधारणपणे एक नकारात्मकताच मनात असते...पण प्रत्येकवेळी तुरुंगात असणारा व्यक्ती कट्टर गुन्हेगारच असतो असं नाही...काही क्षणिक भावनेच्या आहारी जाऊन गुन्हा घडलेले, काही शिक्षेच्या प्रतिक्षेत असणारे, तर काही सुधारण्यासाठी ठेवलेले...कैद्यांचे बरेच प्रकार असतात...बहुतेकांना नंतर आपल्या चुकीबद्दल कधी ना कधी तरी पश्चाताप होतच असावा...स्वतःविषयी अपराधीपणा वाटत असावा....स्वतःची लाजही वाटत असावी...ह्या सगळ्या परिस्थितीत त्यांच्याही काळजात कोलाहल उभा राहत असेलच, नाही असं नाही....ह्या कोलाहलातुनच मग आपल्या भावनांना शब्दात व्यक्त करण्यासाठी त्यातले काही कवितेचा आधार घेतात...पश्चातापाच्या शाईने कविता लिहीली जाते तर कधी कधी आपली फसवणुक होऊन आपण इथे खितपत पडलोय असं वाटल्यावर व्यवस्थेविरुद्धचा विद्रोह देखील कवितेचं रुप घेतो....कैदेत असताना येणारी घरची, घरच्यांची आठवण काहींना व्याकुळ करते, त्यातुनही कविता स्फुरते...तर अशा नाना तऱ्हेच्या कैद्यांच्या नाना प्रकारच्या कवितांचे संकलन करुन उत्तम कांबळे यांनी संपादीत केलेला कविता संग्रह म्हणजे गजाआडच्या कविता......स्वातंञ्यालढ्यात अनेक स्वातंञ्यवीरांनी तुरुंगात असामान्य असं साहित्य निर्माण केलय...अर्थात् हे कैदी काही तसे स्वातंत्र्यवीर नाहीत, पण बाहेरच्या जगातील साहित्याशी आपण परिचीत असतो, ह्या अशा प्रकारच्या संग्रहातुन समाजाने गुन्हेगार म्हणुन शिक्का मारलेल्या, नाकारलेल्या लोकांच्या भावना नक्की काय असतात हे कळायला मदत होते...अन् गुन्हेगार हा ही माणुस असतो... त्याच्यातील दुर्गुणांनी सगुणांवर मात केल्यामुळे तो गुन्हेगार ठरतो...पण आपल्या चुकीची शिक्षा भोगताना जर त्याला पश्चाताप होऊन तो परत माणसु म्हणुन जगु इच्छीत असेल तर आपण त्याच्यातले माणुसपण पाहायला हवे, हे ह्या कविता वाचुन वाटत राहते...सगळेच गुन्हेगार सुधरत नाही हे जितकं खरं तितकंच सगळेच गुन्हेगार कायमस्वरुपी गुन्हेगारच राहतात असंही नाही...वैश्विक सुखाचे पसायदान मागणाऱ्या ज्ञानोबांनी म्हटलेच आहे की,
" जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।। "

ही माऊलींची अपेक्षा आपणही ठेवायला हरकत नाही....ही अपेक्षा पुर्ण होऊ शकते असा विश्वास ह्या कैद्यांच्या कविता वाचुन वाटते...प्रस्थापितांच्या परिघाबाहेरचं हे साहित्य म्हणजे कैद्यांच्या कविता त्यादृष्टीने नक्कीच वाचनीय आहेत.


#असंच_काहितरी
#Book_Review