Wednesday, May 3, 2023

Book Review : दोन मने (वि.स.खांडेकर)


माणसाचं मन तसं न उलगडणारं कोडं...बहिणाबाईंनी पिकातल्या ढोराची उपमा दिलेलं मन...न दिसणारं, न दाखवता येणारं..तरीही आपल्या आयुष्याला दिशा देणारं मन...मनामुळे सगळं कळतं, पण मन कळत नाही असं म्हणतात...याच मनावर कित्येकांनी लिहिलं आहे...पण या सगळ्यांनी वर्णिनेलं मन हे एकच..."माणसाच्या आत दोन मनं असतात, एक पशूचं आणि एक देवाचं...पहिलं उपभोगात रमतं, दुसरं त्यागात आनंद मानतं"...हे सांगणारं पुस्तक‌ म्हणजे वि. स. खांडेकर यांची 'दोन मने' ही कादंबरी...


'प्रीती अन् पराक्रम हेच जीवनाचे डोळे आहेत', असं मानणाऱ्या खांडेकरांच्या बहुतेक कादंबऱ्यांचा विषय प्रीती आणि प्रेम हाच आहे..तोच विषय यादेखील कांदबरीचा आहे.. कादंबरीची मुख्य कथा आहे तीन मिञांची..प्राध्यापक असलेले आगटे, वकिली करणारे बाळासाहेब अन् अनाथाश्रम चालवणारा सुबोध..या तिघा मिञांच्या आयुष्याचा पट उलगडणारी ही कथा..काॅलेजात असणारे आपण अन् पुढे आयुष्यात असणारे आपण यात‌ बऱ्याचदा खूप फरक असतो... तेंव्हा समाजवादी असणारे आपण पुढे भांडवलदार देखील होऊ शकतो, हे सत्य यात अगदी साध्या शब्दात मांडलेले आहे.. कथेतील बाळासाहेब म्हणजे उपभोगवादी माणुस...आगटे हा वैचारिक तरिही परिस्थितीसमोर मान तुकवणारा माणुस...तर सुबोध हा सभोवतालचे दुःख, वेदना पाहुन सन्यस्त झालेला तरीही आपल्या दुबलेपणाला आपला सात्विकपणा म्हणुन आपण जगलो अशी खंत वाटणारा... कथा मुख्यतः बाळासाहेबांच्या भोवती फिरते.. बाळासाहेब चपला नावाच्या एका सिनेनटीच्या प्रेमात पडुन तिच्यासोबत पुण्याला जातो..तिथे जुन्या काॅलेज मिञाची भेट होते..तो चपला लाच त्यांची बायको समजतो...बाळासाहेबही हा गैरसमज दुर करत नाहीत...पण काही दिवसांनी बाळासाहेबांची बायको तिथे येते तेंव्हा बाळासाहेबांचे पितळ उघडे पडते...त्यावेळी त्यांच्या बायकोची अवस्था..बाळासाहेबांच्या मनाला होणारा दंश..आपल्या चुकीच्या वागण्याचा होणारा पश्चाताप.. त्यातुन बाळासाहेबांचे स्वतःच्या आयुष्याचे होणारे मुल्यांकन ... हे सगळे मांडताना अनेक जगण्याचे मंञ शब्दाशब्दात सापडतात...त्यानंतर 'चपला'चे बाळासाहेबांपासुन अलगद दुर होणे...आगटेंचा विद्यार्थी असलेल्या एका 'श्री' नावाच्या हरिजन तरुणाशी जवळीक होणे...दलितांसाठी सत्याग्रह करण्याचा निश्चय घेऊन दलितांसाठी जीवन वाहून घेण्याचा निश्चय करणारा हा तरुण...चपलेसारख्या मोहक तरुणीच्या मोहाला बळी न पडणारा...आपल्या कर्तव्याशी प्रतारणा न करणारा...अन् म्हणुनच चपलेला आवडणारा...पुढे जाऊन तर श्री च आपले दुसरे मन जागे करु शकला, असे सांगुन चपला त्याच्यासाठी हरिजनांच्या सत्याग्रहातही भाग घेते..कथेत बरेच बाकी चढ उतार आहेत..अन्य पाञे आहेत..म्हातारपणातही सत्याग्रहासाठी तयार‌ होणारा 'श्री'चा आजोबा..बाळासाहेबांची पत्नी-निर्मला...सुबोधच्या आश्रमातली माई...इत्यादी.

कथेत ठिकठिकाणी माणसाच्या दोन मनांचा उल्लेख येतो...प्रत्येकात दोन मने असतात...एक उपभोगात रमते तर दुसरे त्यागात ...या दोन मनात कायम झगडा असतो...बाळासाहेबांचे पहिले मन वरचढ ठरले तर श्री चे दुसरे मन....माणसाला आयुष्यात ह्या दोन्ही मनांचा समतोल साधतच जगावे लागते...तसे जगले तरच आयुष्य सुखी होते ..जीवनात‌ अनेकदा भरकटलेला कथेचा नायक बाळासाहेबच आपल्याला जीवनाचे खरे सार सांगुन जातो...
तो‌ म्हणतो,
"जीवन ही लढाई आहे.
जीवन हा यज्ञ आहे.
जीवन हा सागर आहे.
जखमांवाचून लढाई नाही.
ज्वालेवाचून यज्ञ नाही.
वादळावाचून‌ सागर नाही."

अशाप्रकारे जीवनाबाबतचे हे असे शाश्वत सत्य सांगणारी ही कादंबरी. कथा आपल्याला खिळवून ठेवणारी..आपल्या आवडीच्या विषयावरची...स्ञी-पुरुष संबंधाबद्दल आपल्याला जागरुक करणारी...प्रेम म्हणजे फक्त मोह नाही, प्रेम म्हणजे नुसता उपभोग नाही...प्रेमात उपभोग असला तरी तो प्रेमाचा मुख्य भाग नाही, उप आहे...हे अधोरेखीत करणारी.. प्रत्येकाच्या आयुष्यात मोहाचे क्षण येतात, ते मोहक क्षण दाहक अनुभव देखील देऊ शकतात, तेंव्हा अशा मोहाच्या क्षणी सावरायला हवे असे सांगुन आपल्या तारुण्याला सावध करणारी..अन् प्रत्येकामधले पशुचे मन वरचढ होऊ पाहते, हे सांगणारी...म्हणुनच आपल्याला दोन मनांचे हे गौडबंगाल कळावे यासाठी ही कादंबरी वाचायला हवी.

कादंबरीतील काही भावलेली विधाने :
१) निसर्ग भविष्याकडे धावत असतो आणि मनुष्य मात्र भूतकाळात गुंतून राहतो.
२) माणसाला कुठलं तरी वेड असावंच लागतं.
३) जिथं माणूस अत्यंत सुखी असतो तेच त्याचे घर.
४) परिचयाचे पहिले धागे रेशमाहूनही नाजुक असतात.
५) पुस्तकात लिहिलेल्या गोष्टींपैकी न लिहिलेल्या गोष्टीच आयुष्यात जास्त घडतात.
६) पूजा ही जीवनाचा कळस आहे.
७) जीवन मनातले असते ; जनातले नसते.
८) भूतकाळासाठी रडण्यापेक्षा वर्तमानकाळाशी लढण्यात आणि भविष्याच्या शिखरावर चढण्यात मानवी मनाचा खरा पराक्रम आहे.


#असंच_काहितरी
#Book_Review

No comments: