Sunday, January 14, 2024

निमित्त : सत्यशोधक (सिनेमा)

 

प्रत्येक समाजसुधारक हा त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीचे अपत्य असतो...फुले हे देखील त्याला अपवाद नव्हते...मागासलेला, अज्ञानात खितपत पडलेला, मनुस्मृति ला प्रमाण मानणारा, बुद्धीप्रामाण्यपेक्षा ग्रंथप्रामाण्याला महत्व देणारा अन् सगळे असुनही हे सगळे चुकीचे आहे हे माहीत नसणारा भारतीय समाज ही अगदी विसाव्या शतकापर्यंतची परिस्थिती होती....बाहेरुन आलेल्या इंग्रजांनी, पाश्चात्य शिक्षणाने आपल्याला या चुकांची जाणिव करुन दिली, अर्थात् यात त्यांना भारतीयांचा पुळका होता असे मुळीच नाही तर त्यात त्यांचे हित होतेच...त्यांना रंगाने भारतीय पण संस्कृतीने पाश्चात्य समाज घडवुन आपल्या देशातील उत्पादनांसाठी ग्राहक तयार करायचे होते....पण एकमात्र चांगले झाले, त्यामुळे समाजसुधारकांची एक मोठी फळीच निर्माण झाली....ह्या सर्वच समाजसुधारकांनी तत्कालिन समाजात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला....आपण त्यांच्या प्रयत्नांचे ऋणी आहोत..त्यांचे कष्ट, त्याग, संघर्ष हे प्रेरणादायी आहेतच....पण आजचा समाज तसा राहिला नाही, त्यामुळे आज जर हेच इतिहासातले समाजसुधारक वर्तमानात असते तर त्यांचे वर्तन निश्चित वेगळे असते, याचे भान असायला हवे...आगरकर म्हणायचे पाश्चिमात्यांचे अनुकरण करा, अंधानुकरण नको...आगरकांचे हे शब्द आजही तितकेच लागू होतात...फक्त आता पाश्चिमात्याच्या ठिकाणी सिनेमातल्यांचे असे म्हणावे लागेल. कारण दोन तासाचा सिनेमा बघुन आपल्या मनात येणारे असंख्य विचार आपल्याला एकाच वेळी महात्मा फुले व्हायला हवं असं सांगतात तर दुसरीकडे कृष्णराव भालेकरांची दिवाळखोरी व्यवहाराची आकडेमोड डोक्यात जागी करते...डोक्यात काहीच स्पष्ट नसते तरी आपण फुले किती भारी होते असं म्हणुन त्यांना टोकाचं देवत्व बहाल करतो अन् संपलेल्या पाॅर्पकाॅर्नसोबत आपल्यातले फुले सिनेमाघराच्या पायरीवरच सोडुन निघुन येतो..थोडक्यात सिनेमातुन मिळालेली प्रेरणा घरी येईपर्यंतही टिकत नाही...टिकलीच तर त्यात फक्त काहीतरी करायला हवं..हाच विचार सतत पिंगा घालत असतो..नक्की काय करावं ? आज समाजाला कशाची आवश्यकता आहे ? अन् मुळ प्रश्न म्हणजे कसं करावं ? या प्रश्नांचा आपण फारसा विचारच करत नाही. 

आता थोडक्यात सत्यशोधक महात्मा फुले यांच्याविषयी समजुन घेऊया -

फुले हे पुरोगामी विचारांचे खंदे पुरस्कर्ते होते...त्यांनी चातुर्वर्ण्य व्यवस्था, धर्मातील कर्मकांड, समाजातील स्त्रीची अवस्था, कुप्रथा, परंपरा ह्या सगळ्यांवर आसुड उगारला...ब्राह्मणीव्यवस्थेचे कसब लोकांना दाखवुन सलामी ठोकत गुलामी करणाऱ्यांना इशारा दिला..... शेतकरी हा कसा प्रस्थापित राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील पुढाऱ्यांकडून दुर्लक्षीत राहिला हे दाखवुन दिले...धर्मातील सत्य शोधण्याचा प्रयत्न करत सार्वजनिक सत्यधर्म निर्माण केला...हे सगळे करताना एक मात्र खरे की फुले हतबल झाले नाहीत...उठतो अन् आता समाजसुधारणा करतो...खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा असा आव न आणता समाजसुधारणा करण्यासाठी आवश्यक असणारे आर्थिक पाठबळ कमावले, राजकीय लढ्यापेक्षा सामाजिक लढा महत्वाचा आहे हे अधोरेखित करताना राजकीय पद (पुण्याचे नगरसेवक) भुषवुन प्राधिकार मिळवले....वस्ताद लहुजी साळवेंच्या तालमीत शरीर बनवले...थोडक्यात शारिरीक, राजकीय, तथा सामाजिक अशा सर्वच स्तरावर स्वतःला सिद्ध केले अन् सोबत समाजसुधारण्याचे कामही...यातुन शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे फुल्यांकडे फक्त मोठ-मोठे विचार नव्हते, तर सोबतच कृतीही तशी होती, विचारांना कृतीशील आधार होता...शाळा चालवायचा विचार होता, पण शाळेत अडचण आली तर दोन हात करण्याची तयारी होती....बालहत्याप्रतिबंधक गृह सुरु करण्याचा विचार होता, सोबतच बालकांना सांभाळण्याची कुवत होती... दलितांना हक्काचे पाणी मिळावे हा विचार होता, तर त्यासाठी स्वतःच्या घरातला हौद खुला करण्याची धमक होती....सामाजिक सुधारणेकरिता आर्थिक पाठबळ हवे, हा विचार होता तर त्यासाठी कंत्राटी काम घेऊन पैसा जमवण्याचे कसब होते...या सगळ्यांच्या मुळाशी असणारी गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट करायची तर का करायची ? अन् कशी करायची याची स्पष्टता होती..सिनेमात कृष्णराव भालेकर निबंधमालेच्या लेखांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपणही वृत्तपत्र काढावे असा आग्रह धरतात तेंव्ह फुले स्पष्टपणे विचारतात की वृत्तपत्र काढुन काय करायचे ? ज्यांच्यासाठी काढायचे त्यांना ते वाचता येत नाही, अन् ज्यांना वाचता येतं ते आपलं पत्र वाचणार नाहीत...त्यापेक्षा आपण आपली शक्ती लोकांना साक्षर करण्यात वापरु...ही स्पष्टता, असा स्पष्टवक्तेपणा अन् परखडता आपल्यात यावी यासाठी प्रयत्न करायला हवा....हेच ह्या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा वाटले..नव्हे तसे प्रयत्नपुर्वक करण्याचे धाडस ह्या सिनेमाने दिले.


सावधान पुढे धोका आहे 🔇

"सत्यशोधक" सिनेमा पाहुन तुम्हालाही समाजसुधारक व्हावं वाटलं असेल तर थांबा...दिर्घश्वास घ्या अन् एकवेळ स्वतःला विचारा की हे जे समाजसुधारण्याचे, सामाजिक कार्याचे स्वप्न मी पाहतो आहे हे मी कसे पुर्ण करु शकेल ? यासाठी लागणारी विचारातील स्पष्टता माझ्यात आहे का ? असेल तर पुढचा टप्पा म्हणजे ह्या विचारांना सत्यात आणण्यासाठी मी कितीसा सक्षम आहे ? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं समाधानकारक असतील तर नक्कीच समाजसुधारण्यासाठी काकणभर का होईना आपण आपलं योगदान नक्की द्यायला हवं....मात्र आपल्याकडे बऱ्याचदा फक्त उद्दात्त विचार असतात, पण त्यासाठी आवश्यक पाठबळ नसते...त्यामुळे आपण विचारक होऊ शकतो मात्र सुधारक नाही....सुधारक होण्यासाठी विचारांना कृतीचं पाठबळ हवं, कृतींना खंबीर आधार हवा ...अन् त्यासाठी समाजसुधारण्या आधी वैयक्तीक बलस्थानं अधिक बळकट करायला हवीत...सुरवात स्वतःत सुधारणा करण्यापासुन व्हायला हवी....समाजसुधारणेची हिच तर पहिली पायरी आहे...नाही का ?


#असंच_काहितरी

No comments: