Tuesday, January 2, 2024

Book Review : जगण्याच्या जळत्या वाटा (उत्तम कांबळे)


शाळेत असताना सकाळ पेपरच्या सप्तरंग पुरवणीतील उत्तम कांबळे सरांचे लेख आवर्जुन वाचलेले.....सरांचे 'फिरस्ती' हे सदर त्यावेळी प्रसिद्ध असलेले....या लेखांचा विषय सामान्य माणुस अन् त्याच्या वाट्याला आलेले आयुष्य हा असायचा, त्यामुळे हे लेख म्हणजे आपल्या आजुबाजुच्या जगाची माहिती देणारे असायचे...वाचताना तंद्री लागायची...एकदा लेख वाचायला सुरु केला की कधी वाचुन झाला कळायचं पण नाही...आपण स्वतः एकच आयुष्य जगु शकतो...पण वाचनातुन आपण इतरांच्या आयुष्यातील घटना, प्रसंगातुन शिकत आपलं आयुष्य समृद्ध करु शकतो...त्याकरीता वाचलं पाहिजे...माझ्याबाबतीत वाचनाविषयीची आवड रक्तातुनच वाहत मागच्या पिढीतुन माझ्यात आली... मी ती आजपर्यंत जिवंत ठेवली आहे अन् जिवंत असेपर्यंत जिवंत राहीलच कारण वाचनाने खुप काही दिलं आहे....आजुबाजुचं आपल्याला दिसणारं जग दिसतं तसंच नसतं, हे वाचनातुन कळालं...इतरांच्या आयुष्यातील दुःख, वेदना अन् संघर्ष वाचुन आयुष्यातील स्वप्नांच्या पाठीमागे धावताना प्रेरणा मिळाली....समाजातील भल्या बुऱ्यांचं दर्शन पुस्तकातुन होत आलं ...माणसं वाचण्यासाठी पुस्तकं वाचणं आवश्यक असतं...खरंतर पुस्तकातुन भेटलेली माणसं प्रत्यक्षात भेटलेल्या माणसांपेक्षा जास्त शिकवुन जातात, आधार देतात, प्रेरणा देतात, कधी हसवतात, तर कधी रडवतात, कधी विचार करायला लावतात, आयुष्याचा अर्थ उलगडुन दाखवतात, माणसांच्या जगण्याच्या तऱ्हा समजु लागतात.....आजुबाजुचं जग नव्या नजरेनं बघण्याची ताकद पुस्तकं देतात...तर हे असे असंख्य फायदे पुस्तकं सर्वांना देतात...वाचक पुस्तकांमध्ये भेद करु शकतो, मला हे वाचायचं ते नको किंवा मी ते नाही वाचणार मला हेच हवं असं वाचक म्हणु शकतो....पुस्तकं माञ तोच संदेश, तोच मार्ग वाचणारा कुणीही असला तरी दाखवत राहतात...म्हणुन पुस्तकं वाचली पाहिजे...पुस्तकंच नाहीतर अगदी वर्तमानपत्र असो वा नियतकालिक जे वाचण्यायोग्य ते सर्व वाचलं पाहिजे...अर्थात् हे सारं मी वाचुनच शिकलो आहे...वाचल्यावरच कळलं की वाचलं पाहिजे, म्हणुन वाचत गेलो अन् अजुनही वाचतो आहे....

तर मुळ विषय आहे सरांच्या 'फिरस्ती'चा ...हे सदर साधारणतः मी आठवी - नववीत असेल तेंव्हा यायचे....आता त्याला जवळपास बारा तेरा वर्ष झाली...बरेच लेख विस्मरणातही गेलेले...पण मागच्या सरत्या वर्षाच्या शेवटी पुण्यात भरलेल्या पुस्तक महोत्सवात (पुस्तक महोत्सवाचा काळ : 16 - 24 डिसेंबर 2023) फिरताना मनोविकास प्रकाशनाच्या स्टाॅलवरती 'निवडक फिरस्ती - जगण्याच्या जळत्या वाटा' ह्या नावाचं उत्तम कांबळे सरांचं पुस्तक दिसलं....पुस्तक बघितल्यावर लक्षात आलं की जे 'फिरस्ती' सदर आपण वाचायचो त्यातीलच लेखांचे सरांनी दोन पुस्तकात रुपांतर केले आहे...त्यातील दुसरा भाग म्हणजे हे 'जगण्याच्या जळत्या वाटा' हे पुस्तक... पुस्तक हातात घेतलं अन् लगेच विकतही घेतलं....विकत घेऊन तसंच ठेवुन देणं शक्य नव्हतं...बऱ्याच पुस्तकांच्या नशिबी हे असं विकत घेतलं जाणं पण लवकर वाचलं न जाणं येतं..ह्या पुस्तकाबाबतीत ते झालं नाही...पुस्तक आणल्यानंतर लगेच वाचायला घेतलं अन् वाचुन काढलं...पुस्तक वाचताना जुन्या 'फिरस्ती' सदराची आवर्जुन आठवण आली....पुस्तकातील लेख अर्थात् अप्रतिम आहेतच...पण महत्वाचं म्हणजे शाळेत असताना ज्यातलं मर्म तेंव्हा कदाचित कळत नव्हतं ते आता समजतय...आपल्या आजुबाजुच्या जगावरचं हे भाष्य आता विचार करायला भाग पाडतय...पुस्तकात चाळीसपेक्षा अधिक लेखांचा संग्रह आहे....प्रत्येक लेख आपल्याला व्यक्ती, घटना, प्रसंग यांची भेट घडवतो...लेखातील व्यक्ती विषयी माहीती मिळण्यासोबतच त्या अनुषंगाने सरांनी त्याबाबतीत केलेलं भाष्य हे फार विचार करायला लावणारं...अंतर्मुख व्हायला लावणारं आहे....आयुष्य म्हणजे एक प्रवास असं आपण ऐकलं, वाचलं आहे...ह्या आयुष्याच्या प्रवासात फिरताना आपल्याही भेटतात अनेक व्यक्ती, अनेक घटना, अनेक प्रसंग आपल्याही वाट्याला येतात...पण आपण कधी त्यावर फारसा विचार करत नाहीत किंवा कधी कधी तर ह्यावर विचार केला पाहिजे हे ही आपल्या ध्यानीमनी येत नाही..अशा व्यक्ती, घटनांवर सरांनी विचार केलाय अन् ते फिरस्तीत मांडुन आपल्यालाही फिरताना डोळे उघडे ठेवुन फिरण्याचा जणु अप्रत्यक्ष पणे कानमंत्रच दिलाय....प्रत्येक लेखामध्ये आपल्याला कुणी ना कुणी भेटतो...ज्याच्या जगण्याच्या वाटेवर काही ना काही अडचण आहे...काही ना काही वेदना आहे....जगताना धावणाऱ्या पृथ्वीसोबत पळणं आहेच, पण पळताना जळणंही वाट्याला यावं असं काहींचं प्राक्तन असतं...ही अशी माणसं जगणं ज्या धीरोदत्तपणे जगतात, ते नेहमीच प्रेरणादायी असतं...अशा अनेक प्रेरणादायी कथा आपल्याला ह्या लेखांमधुन वाचायला मिळतात....ह्या कथांमधुन सरांनी अनेकांच्या दुःखाला वाचा फोडली होती...अनेकांच्या असहायतेला सरांच्या लेखणीने आधार दिला...समाजाने दुर्लक्षित ठेवलेल्या अनेकांकडे ह्या लेखांमुळे समाजाचं लक्ष गेलं...

बालकामगाराची अवस्था असो वा नोकरी करणाऱ्या आई वडिलांच्या बंद दारा आड राहणाऱ्या पोरांची अवस्था असो... बालकांच्या सामाजिक, मानसिक स्थितीवर अचुक भाष्य यातील संबंधीत लेखांमध्ये करण्यात आलेले आहे...खासगी शाळेत मुलांना शिकवण्याचं वाढतं प्रमाण यावर भाष्य करणारा एक लेख यात आहे.. त्याच‌ बरोबर डोनेशन ह्या गोंडस नावाखाली पैसे घेऊन मास्तर करणारी खासगी महाविद्यालयं व तिथली व्यवस्था, त्या व्यवस्थेचे शिकार होणारे अशा एकुण परिस्थितीवर प्रकाश टाकणारा लेखही यात आपल्याला वाचायला मिळतो...आपल्या अपंगत्वावर मात करत वेदनेतुन कवितेचा वेद निर्माण करणारे लक्ष्मण गोळे, घोळाची भाजी विकणारी मावशी, मुक्या-बहिऱ्याला पदरात घेऊन संसार करणारी माता किंवा स्मशानात मृतदेहाला मसाज करणारी सुनिता, अशी नाना प्रकारची माणसं आपल्याला यातील विविध लेखांमध्ये भेटतात...माणुस हे अजब रसायन आहे, अन् प्रत्येकाचे जगणे किती कमालीचे असते याची प्रचिती ह्या लेखांमधुन येते....विविध सामाजिक बाबींवर भाष्य करणारे लेख आपल्याला ह्यात वाचायला मिळतात....जसे, हाॅटेलात वाया जाणारे अन्न, प्रत्येक गोष्ट सरकारची जबाबदारी आहे म्हणत अंग झटकणारे नागरीक, स्वतः खस्ता खाऊन आपल्याला शिकवणाऱ्या आई-वडिलांना सांभाळण्यास नकार देणारे पोर, अध्यात्माच्या आहारी जाऊन विज्ञानाची अवहेलना करत वैद्यकीय उपचार न करणारा वयोवृद्ध, सृजनाची ताकद असलेल्या तरुणाईला हलकट जवानी म्हणणं, देहदान इत्यादी. असे विविधांगी लेख वाचताना पुढच्या लेखाकडे जाण्याआधी मागच्या लेखांमधील गोष्टींवर विचार केल्यास मनात अनेक विचार येत राहतात...आपल्याला विचार करण्यास भाग पाडणारे हे लेख एकवेळ अवश्य वाचायला हवेत..लेख जुने असले तरी यात विविध सामाजिक घडामोडींवर, समाजातील मुल्य व्यवस्थेवर केलेलं भाष्य हे आजही प्रासंगिक आहे....तेंव्हा हा वाचनीय लेख संग्रह आवर्जुन वाचायला हवा....अन् ह्या जगण्याच्या जळत्या वाटा धुंडाळायला हव्यात....आपल्या आयुष्याच्या वाटेवर आपलं चालणं सोपं व्हावं म्हणुन....!!!



#असंच_काहितरी
#Book_Review

No comments: