तुमचाच
शशिकांत बाबर
(परि. नायब तहसीलदार)
तुमचाच
शशिकांत बाबर
(परि. नायब तहसीलदार)
"कधी निराशा खिन्न दाटली
कधी भोवती रान पेटले
परि अचानक वळणावरती
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, थुगाव निपाणी, पंचायत समिती नरखेड, नागपुर येथील मुलांनी आज वनामती संस्थेच्या माननीय संचालिका, श्रीमती मिताली शेठी यांच्याशी संवाद साधला. त्यांचा आतापर्यंतचा एकंदरीत प्रवास, प्रशासनातील त्यांचे काही अनुभव, त्यांच्या नवनवीन कल्पना याबद्दल मुलांनी जाणुन घेतले. तसेच मुलांनी त्यांच्या काही कल्पनांची देखील मॅडमसोबत चर्चा केली. अतिशय उत्कृष्ट अशी मुलांची बँक संकल्पना त्यांनी मॅडमला सांगितली. हा झाला आजच्या भेटीचा औपचारिक वृतान्त ...
मी तुम्हाला जे सांगणार आहे ती औपचारिकता नाही.... तर मॅडम ह्या मुलांशी चर्चा करत होत्या..त्यांची चर्चा शेवटाकडेच आली होती, तेंव्हा आम्ही त्यात सामिल झालो. मॅडम ने त्यांचा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच प्रकल्प अधिकारी, धारणी या पदांवरील अनुभव थोडक्यात सांगितला. ह्या ७/८ वीच्या मुलांचे प्रश्न अतिशय स्पष्ट आणि तितकेच आत्मविश्वासपुर्ण होते... नंतर आम्ही आमची ओळख मुलांना करुन दिली, त्यांनी त्यांची ओळख करुन दिली. ही मुलं इतकं छान बोलत होती, ऐकत होती की त्यांच्याबद्दल एक वेगळच कौतुक मनाला वाटत होतं... मॅडम ने राणी बेटी माहितीपटाची चिञफीत दाखवली. (चिञफित बघण्यासाठी लिंक :https://youtu.be/ptFXEqibDzw) धारणीसारख्या ठिकाणी काम करतानाही अगदी नाविन्यपुर्ण पद्धतीने, तेथील आदिवासी समुदायाला समजुन घेऊन, त्यांच्याशी आपुलकीची भावना जोपासत त्यांच्यासाठी मॅडमने कार्य केल्याचे ह्या व्हिडीओमधुन जाणवले. आदिवासींना आपण त्यांचे वाटत नाही कारण आपण आपल्या शहरी भाषेत बोलतो, त्यांना ती फार उमजत नाही अन् आपल्याला त्यांची भाषा समजत नाही...त्यामुळे त्यांच्या भाषेत मोडका तोडका का असेना थोडाफार तरी आपल्याला त्यांच्याशी संवाद साधता यावा, असं मॅडम सांगत होत्या. मुलांचा एकुण टापटिपपणा अन् त्यांचे शिक्षण कौशल्य हेही फार आकर्षुन घेणारी गोष्ट होती. आम्ही शाळेत असताना काहींना नीट मराठी येत नसायची, ही मुलं मराठी, इंग्रजी सोबतच परदेशी भाषेचेही धडे घेत आहेत..ही फारच अभिमानास्पद व कौतुकास्पद बाब आहे. चर्चेअंती एका मुलीने चक्क जपानी भाषेत तर दुसरीने चक्क जर्मन भाषेत आभार प्रदर्शन केले, तेंव्हा आपणही ह्यांच्याकडुन शिकलं पाहिजे... अभ्यास, परिक्षा यासोबतच अशा नवनवीन संकल्पना राबवण्यासोबतच बरंच काही ही मुलं शिकतायत...
जिल्हा परिषद शाळा म्हणजे मोडकळीस आलेली शाळा, कधीतरी येणारे मास्तर, अन् कामापुरतं शिकुन कसंतरी करत आठवीपर्यंत पास व्हायचं असं ठरवणारे विद्यार्थी असं काहीसं चिञ सर्वसाधारण आपल्या कल्पनेत असु शकतं, पण ही शाळा, इथले मास्तर, अन् इथले विद्यार्थी सारेच अगदी अप्रतिम, सृजनशील अन् कल्पक.... साधारण प्रतिमेला छेद देणारी ही शाळा अन् हे विद्यार्थी हे उद्याच्या विकसीत भारताचे आश्वासक चिञ आहे. अशा असंख्य शाळा उभ्या राहोत... प्रत्येक जिल्हा परिषद शाळा अशाप्रकारे उभी राहिली तर उद्याचे सुजाण नागरिक घडवण्याची जबाबदारी सहजतेने पार पाडली जाऊ शकेल. प्रशासनात येण्याचं स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकानेच हाच विचार करुन प्रशासनात यायला हवं की इथे येऊन काहीतरी फरक आपल्याला पाडता येईल. सर्वसामान्य म्हणुनच जगायचं असेल तर इथं येऊन फारसा उपयोग नाही.... इथे आपल्याला आपल्या पुरतं तरी सुंदर विश्व निर्माण करताच यायला हवं... जग बदलेल का माहित नाही...मी बदलेल, एवढाच विश्वास अन् हिच तळमळ आपल्यात कायम रहावी एवढीच अपेक्षा. आज भेटीनंतर ह्या लहानग्यांना पाहुन असं वाटलं की आपण लहानपणी जरा लहानच होतो, अन् मॅडमकडे पाहिल्यावर वाटलं आपण अजुनही लहानच आहोत.... कदाचित पुढेही लहानच राहु, पण लहान का असेना बदल घडावा एवढच... तसही सुर्य होण्याचा अट्टाहास नाहीच, स्वयंप्रकाशी काजवा होता यावं एवढच..! करण्यासारखं बरच काही असतं, शिकण्यासारखं बरच काही असतं....करत राहुयात, शिकत राहुयात !!
माझ्या हाती
नसती लेखणी
तर....
तर असती छिन्नी
सतार...बासरी
अथवा कुंचला
मी कशानेही
उपसतच राहिलो असतो
हा अतोनात कोलाहल मनातला
अशा शब्दात अभिव्यक्ति स्वातंञ्याचं महत्व विषद करणारा हा कवि...जो कवी म्हणुन तसा फारसा परिचित नाही...त्याच्या चिञपटांनीच जाळ अन् धुर संगटच करत सगळ्यांना सैराट करुन सोडलेलं आहे...उपेक्षित घटकांचा अनपेक्षित आवाज होण्याचं काम त्याच्या कलाकृती करत असतात...हाती कॅमेरा येण्याआधी त्याच्या हाती लेखणी आली अन् त्याने त्यातुन कविता प्रसवली..नेमकी कविता कशी सुचली ? ह्या प्रश्नावर तो कवितेतुनच उत्तर देतो अन् म्हणतो की, "उजाडताना मी माझ्यावर कवितेनं धरली सावली, कुणास ठाऊक कशी मनात अंकुरली कविता...पृथ्वीला कशी सुचली झाडे ?" थोडक्यात काय तर सर्वसाधारण सर्वच कविंना न सुटणारा गुंता म्हणजे कविता नक्की कशी सुचते ? हा गुंता न सोडवता उलटपक्षी पृथ्वीवर जशी अनपेक्षित आणि नैसर्गिकपणे झाडे अंकुरतात, तशीच कविता नैसर्गिकपणे कविला सुचत असते असं सांगुन प्रचंड ताकदीने अन् जिवाच्या आकांताने लिहिणारा कवि आहे प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेता नागराज मंजुळे....नाव जरी मंजुळ असले तरी तो माञ नागराज नावाला जास्त जागतो असंच त्याच्या कविता वाचताना वाटते...नागराज अण्णा हा प्रचंड मोठा माणुस झालाय, पण तो कुठे पोहचला यापेक्षा तो कुठुन आला हे बघितल्यावर ह्या माणसावर प्रेम हॊऊन जाते.
नरेंद्र जाधव म्हणतात की, “नागराज मंजुळे हे २१व्या शतकातील सत्यजित राय आहेत. अस्सल आणि वास्तववादी समाजचित्रण तर ते करतातच, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ते सामाजिक संदेश देऊन जातात.” हे विधान नागराज अण्णांचा हा कविता सग्रह वाचल्यावर अधिक खरे वाटायला लागते. कविता संग्रहाचे नावच अतिशय परखड व आकर्षक आहे...उगाच समाजाच्या ठरलेल्या साच्यात बसण्याच्या हट्टापायी जेंव्हा आपण सारंकाही गुमानं सहन करत असतो, तेंव्हा आपली घुसमट होते, आपण अस्वस्थ होतो, तरिही कुणीतरी काहीतरी म्हणेल, कुणीतरी नाव ठेवेल ह्या भितीतुन आपण सरधोपट मार्ग स्विकारतो...आपल्याला हवं तसं चालत नाही, हवं तसं बहरत नाही... वटवृक्ष होण्याची ताकद असतानाही कुंडीतलं रोप बनुन राहतो....अशा वेळी आपण कुठल्याही ढगांना न घाबरता आपण आपल्या विस्तिर्ण आकाशात झेपावलं पाहिजे....कितीही अवरोध झाला तरी आपण आपली दिशा अन् आपली गती सोडता कामा नये...असं तो सांगत राहतो...बाहेर कितीही असह्नय ऊन असलं तरी त्याच्या विरुद्ध त्वेषाने फुलायला हवं... हेच सांगण्यासाठी कवि 'उन्हाच्या कटाविरुद्ध' ह्या कवितेत म्हणतो,
या अनैतिक संस्कृतित
नैतिक होण्याच्या हट्टापायी
का देते आहेस
एका आभाळणाऱ्या
मनस्वी विस्ताराला मूठमाती
का तू
उन्हाच्या कटाविरुद्ध
त्वेषानं फुलत नाहिस.....
असं त्वेषानं फुलणं जमलं तर खरच किती सोपं होईल जगणं अन् समृद्धही, पण नेमकं हेच तर जमत नाही आपल्याला...हिच खंत ह्या कवितेत मांडलेली आपल्याला दिसते. पण खरा कवि फक्त दशा मांडुन शांत बसत नाही, तर दिशा दाखवण्याचंही काम करत असतो..समाजातल्या कायम दुर्लक्षित राहिलेल्या, उपेक्षित घटकांकडे देखील नागराज अण्णांची कविता आपल्याला घेऊन जाते...कष्टकरी, पिचलेल्या, सामान्य माणसाच्या वेदनेची ही कविता आहे. प्रेम, प्रेमभंग, मैञी, झोपडपट्टीतले जगणे, निसर्ग, तृतीयपंथीयांचं अस्तित्व, अशा आपल्या आजुबाजुच्या असंख्य गोष्टीकडे कविचे किती बारकाने लक्ष आहे याची जाणिव या संग्रहातल्या कविता वाचताना होते. अगदी चार सहा ओळीत अगदी ताकदीने मांडली संकल्पना, मांडलेला विचार आपल्याला विचार करायला भाग पाडतो... अगदी छोट्या छोट्या पण खोल अर्थ असलेल्या ह्या सर्व कविता आहेत.. कविता ही फक्त जगाचं रडगाणं गाण्यासाठीच करायची नसते तर ती जगण्याचा आधार असते...ती आपल्याला दुःखात कधी हसवते तर हसताना कधी अलगद आपल्या पापण्या ओलावते...कवितेची आपल्या आयुष्यातली भुमिका मांडताना कविने मिञ ही कविता रचली..ज्यात तो म्हणतो,
"आम्ही दोघे मिञ
एकमेकांचे जिवलग
एकच ध्येय एकच स्वप्न घेऊन जगणारे
पुढे त्याने आत्महत्या केली
आणि मी कविता लिहीली"
थोडक्यात काय तर कविता किती मोठी भुमिका बजावते हेच जणु यात नागराज अण्णांनी मांडलेले आहे. अशा प्रकारच्या जवळपास पन्नासहुन अधिक कविता अगदी छोट्याशा हातात मावेल अशा ह्या संग्रहात दिलेल्या आहेत. प्रत्येक कविता वाचल्याक्षणीच लक्षात राहावी इतकी छोटी पण प्रभावी. दिग्दर्शक म्हणुन प्रसिद्धेच्या शिखरावर पोहचलेले नागराज अण्णा साहित्यातही कवितेचा अप्रतिम नमुना देऊन जातात...त्यामुळे अण्णांचा चिञपट जितका प्रेक्षणीय तितकीच त्यांची कविता वाचनीय आहे.. नागराज मंजुळे यांची 'तुझ्या येण्याअगोदर एक पञ' ही ह्याच संग्रहातील कविता त्यांच्या एका मुलाखतीत टिव्हीवर खुप वर्षाआधी ऐकली होती...तेंव्हाच त्यांच्या 'ऊन्हाच्या कटाविरुद्ध' ह्या कवितासंग्रहाबद्दल ऐकले होते...अन् त्यानंतर हा संग्रह वाचायला मिळावा यासाठी प्रयत्न केला होता..बऱ्याच वर्षानंतर हि इच्छा पुर्ण झाली अन् अपेक्षेपेक्षाही अप्रतिम असा ठेवाच जणु हाती लागला.सर्वांनीच आवर्जुन वाचावा अन् संग्रही ठेवावा असा हा कवितासंग्रह...अवश्य वाचाच.
#असंच_काहितरी #Book_Review